'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 21 March 2017

सामाजिक काम हेच करिअर निवडताना भीती नाही वाटली? (भाग २)

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या दहा वर्षांत निर्माणच्या एकूण सहा बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची वेगळीनजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा प्रश्न :

आयुष्याची, करिअरची अत्यंत महत्वाची वर्षे सोशल कॉजला देताना भीती नाही वाटली? त्यावेळी काय फायद्यातोटय़ाचा विचार केला?

इंजिनिअरींगच्या शिक्षणाने मला कौशल्य व आत्मविश्वास दिला. चांगलं करीअर म्हणजे मोठी challenges स्वीकारणे, प्रॉब्लेम्स सोडवणे याची उर्मी, प्रचंड इच्छाशक्ती दिली. मला वाटतं, या आधारे आम्ही पण इतरांसारखेच करीअर करत आहोत. फक्त निवडलेली challengesही थोडी वेगळी आहेत. social challenges आहेत. ही वेगळी आहेत म्हणूणच अवघड वाटतात. पण आपण जेवढं टफ, अवघड काम तेवढं ते करीअर भारी समजतो. मग खर तर सोशल कॉजमुळे आपले करीअर भारी बनत असते !
- निर्माणमध्ये नायना( डॉ. बंग) हे सांगत नवीन काम/business करण्याची एक strategy:-blue ocean startegy. ज्या भागात निळा समुद्र आहे तिथे मासे पकडण्यात तुम्हाला यश मिळू शकते. कारण इतर सर्व लाल समुद्रात मासे पकडण्याची गर्दी करत असतात व स्पर्धा करत असतात.  मला वाटतं social cause निवडून आम्ही करीअरसाठी blue ocean strategy स्वीकारतो. म्हणूणच यश मिळवण्याचे चॅन्स वाढतात. खर तर यशाची मापदंड / बेंचमार्क ठरवण्याची आम्हाला संधी असते. हे तर किती भारी करीअर !
- दुसरी गोष्ट वेगळं काही करताना, आपण एकटेच आहोत म्हणूण भिती वाटत असते. ही भीती जे करतो त्याबद्दल कमी असते,या पेक्षा आपण एकटेच आहोत याची जास्त असते. निर्माणमुळे असा समविचारी गट मिळाला व भिती कमी झाली.
- सद्य शिक्षण व समाजव्यवस्थेत फायदे फक्त tangible, दृष्य स्वरूपातच पाहण्याची सवय लागली आहे. पैसा मिळाला तरच फायद्याचं असे समीकरण पक्कं असतं. खरतर tangible गोष्टी एका मर्यादेपलीकडे आपल्याला आनंद देऊ शकत नाहीत. मग ते ice cream असो नाही तर गाडी बंगला. पण intangible, अदृष्य रुपातील गोष्टी नित्यनवा आनंद देत असतात. अशा intangible गोष्टी म्हणजे एखाद्या किचकट प्रॉब्लेमचं सोलूशन सापडणं.... ते विश्वासाची realtions बनणं, प्रेम, धन्यवादाचं smile, समाधान... यादी न संपणारी आहे. मला वाटतं आमच्या करीअरची ही खरी कमाई, खरा फायदा ! Tangible गोष्टी,पैसा हे तर बोनस आहे !
-आश्विन भोंडवे, निर्माण ३
ज्ञान प्रबोधिनी, हराळी


Start with End या तर्काने खूप विचार केला तेव्हा मला उत्तर मिळाले कि आयुष्याच्या शेवटी माझ्याकडं किती संपत्ती आहे ह्याच्यापेक्षा मी किती जणांना उपयोगी पडू शकले हे महत्वाचे आहे. निर्माण कॅम्प मध्ये नायनांनी सांगितल्याप्रमाणे Need आणि Greed या माझ्या मला ओळखता आल्या. त्या नंतर एखाद्या सोशल कॉजला आयुष्य देताना कसलीच भीती नाही वाटली.
माझं Profession चार्टर्ड accountant (CA). तरी पण मला सामाजिक संस्थांच्याच आर्थिक नियोजन साठी काम करण्यात  जास्त रस आहे. हीच माझी Main practice असेल (side practice नाही) याबाबतीत मी ठाम होते.
त्यासोबत आर्थिक गुन्ह्याच्या तपासा मध्ये सरकारी यंत्रणेला मदत करताना मला माहित असते कि मी जितकं चांगले काम करेन तितक सामान्ये लोकांना त्यांचे बुडालेले पैसे मिळतील. या दोन्ही कामात पैसे कमी मिळतात असे लोकांना वाटते पण तुमच्या गरजा भागवण्याइतके निश्चितच मिळते. रोज कामा ला जाताना मी खुश असते आणि येताना देखील. मी आज काहीतरी उपयोगी केलाय, इतका विश्वास असल्यावर आपण वेगळा मार्ग निवडल्याची कधीच भीती नाही वाटत.
गीता लेले, निर्माण ६
CA झाल्यानंतर गीता सध्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासामध्ये सरकारी यंत्रणेला मदत करते


            'वैयक्तिक करियर विकसीत करणे' या फॅशनला फार जास्त महत्व देवू नये असं मला वाटत पण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असाव असं पण वाटत.
म्हणून कॉलेज संपल्यासंपल्या, 'माझी आर्थिक गरज नेमकी किती?' हे मी 'व्यवस्थित' तपासून पाहिलं, आणि 'माझ्याजवळ असलेल्या कौशल्यांचा बाजारभाव खरचं किती?' हे पण तपासून पाहिलं. माझ्या गरजेइतके पैसे मी सहजच कमवू शकतो असं लक्षात आल्यामुळं आर्थिक असुरक्षिततेची भावनापण संपली.
                                                                                                                   
निरंजन तोरडमल, निर्माण ५
निरंजन Mechanical Engineer आहे. हमालांना पाठीचा त्रास कमी व्हावा या हेतूने ‘स्केलेटन’ बनवत आहे.



              आयुष्य फार थोडं आहे, मस्त पैसे कमवायचे, मजा करायची आणि आयुष्यात एन्जॉय करायचं असतं असे माझे मित्र नेहमी मला म्हणायचे. पण मला मात्र नेहमी उलटच वाटायचं, की आयुष्य फार सुंदर आहे, फार मोठं आहे. आपण आपल्या आयुष्यात कोणाच्या कामी आलो नाही, कोणाच्या चेह-यावर आलेल्या आनंदाचं कारण बनू शकलो नाही तर आपलं आयुष्य निरर्थक ठरेल. म्हणून मी महाविद्यालयीन जीवनापासूनच 'आपलीच गाडी, आपलीच माडी आणी आपल्याच बायकोची गोल गोल साड़ी' या ठरावीक चक्रात न अडकता आपला तरुणपणीचा हा उमेदीचा काळ सोशल कॉजच्या (खरं तर हा सोशल कॉज नसून माझा आनंद त्यात आहे) गुंतवणुकीत टाकण्याचा निर्णय घेतला. आयुष्य छोटं जरी असलं तरीपण आपल्याला हे छोटं आयुष्य समृद्ध कसं करता येईल? हा प्रश्न दिवस रात्र माझ्या मानगुटीवर बसलेला असायचा. मी कला शाखेचा (चुकुन) विद्यार्थी असल्यामुळे पुस्तकांशी, साहित्यांशी बराच संबंध येत गेला. त्यामुळे जगाची, जगातल्या प्रश्नांची ओळख होत गेली आणि त्यातूनच पुढे समृद्ध होण्याचा मार्ग गवसत गेला.
              आपण नेहमी व्यवस्थेला शिव्या घालत असतो, नावं ठेवतो त्यापेक्षा आपन प्रत्यक्ष काम करू मग ते काम कितीही लहान असो. त्यात खारीचा का असेना माझा वाटा असला पाहिजे असे मला वाटायचे. आणि पुढे मी कशात रमतो? मला काय आवडतं जे करता करता मला गरजेपुरते पैसे मिळवता येतील? मी कोणती गोष्ट आयुष्यभर उदात्त ऊर्जेने करू शकतो? या गोष्टीचा मार्ग सापडला. परिस्थितिवरून आणी स्वानुभवावरून लहानपणापासूनच कमीत कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त जगायची सवय लागलेली होती. पगार अतिशय कमी होता. माझ्या बाकीच्या मित्रांनी स्वत:चे घर घेतले, गाड्या घेतल्या, धंद्यात सेटल झाले. आपलं कधी हे होणार? आपण असेच मरणार का? असे प्रश्नंही मधे मधे डोकवायचे. घरच्यांनाही याने मित्रांसारखं रहावं असं खुप वाटायचं. पण मी बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटीज न देता वर्तमानात जगण्यासाठी सध्याच्या आनंदावर फोकस करण्याचे निश्चित केले.
              कशासाठी जगायचंय हे लक्षात आल्यावर कसं जगायचं हा प्रश्न उरत नाही असे नायना नेहमी म्हणायचे. त्याचा मलाही प्रत्यय आला. भीती ही काल्पनिक असते. भीती या गोष्टीचीच  आपल्याला खुप जास्त भीती वाटत असते. त्या भीतीवर जर का आपण मात करून वरती चढलो तर आनंदाचा धबधबा आपली वाट बघत असतो हे नक्की..
डर के आगे जीत हैं...!
धीरज वाणी, निर्माण ६
धीरज जिल्हा परिषद नाशिक (ता. सटाणा) मध्ये सर्व शिक्षा अभियान विभागात कार्यरत आहे


आयुष्याची 4 वर्षे इंजिनीअरींग मधे घालवल्यानंतर आता पुढे काय करायचं हा एक मोठाच प्रश्न माझ्यासमोर होता. माझ्या असण्याचा, जगण्याचा मला हवं असेल किंवा नसेल, कुठल्यातरी लोकांवर फरक पडणारच आहे हे एव्हाना माझ्या ध्यानात आलं होतं. म्हणजे समजा मी एखाद्या कंपनीत काम करायला गेलो तर त्या कंपनीने बनवलेल्या उत्पादन वापरणार्‍या लोकांवर व एकूणच मी राहत असलेल्या जागेतील अर्थव्यवस्थेवर माझ्या असण्याचा परिणाम होईल.
            मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो. एखाद्या मध्यमवर्गीय कुटूंबातील मुलाच्या ज्या काही (आवश्यक आणि अनावश्यक) गरजा असतात त्या माझ्या आई वडिलांनी अगदी 100% पुरवल्या. ते माझ्या गरजा पुरवु शकतील या पातळीवर त्यांना पोचवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या कष्टांबरोबरच समाजातील खूप सार्‍या इतर लोकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कष्ट कारणी लागले आहेत. आणि कदाचित त्यातीलच खूप सार्‍यांच्या प्राथमीक गरजाच अजुनही पूर्ण होत नाहीयेत. मग माझ्या जगण्याचा नक्की कोणावर परिणाम व्हावा ?
मागिल 2 वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील दारु व तंबाखूच्या प्रश्नावर काम करतोय. एखाद्या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते व शास्त्रीय पद्धातीने एखाद्या प्रश्नाला कसे हाताळावे हे मी या काळात शिकलो. सतत लोकांपासुन दुर पळणारा मी लोकांशी संवाद साधायला व त्यातून एकूणच इतरांच्या साधेपणातील सौंदर्य अ‍ॅप्रिशिएट करायला शिकलो, शिकतोय.
काम करत असताना सतत स्वतःचे कम्फर्ट झोन तोडावे लागले.  मनात उडणारा वैचारिक गोंधळ, सतत येणारे भावनिक चढ -उतार, एकुणच आयुष्यातील अनिश्चीतते बद्द्ल वाटणारी भीती, प्रत्यक्ष काम करताना येणा-या  अडचणी हे सर्व हाताळताना मित्रांकडुन अगदी न थकता वारंवार मिळत असलेलं प्रेम व विश्वास यातुनच   स्वतःबद्द्ल व इतरांबद्दल असलेली माझी समज वाढतेयमाणुस म्हणुन मी सतत वाढतोय.  
आता यात नक्की कोणी कोणाला काय दिलं ?
प्रतिक वडमारे, निर्माण ६
प्रतिक गडचिरोली मध्ये दारू व तंबाखू विरुद्ध सुरु झालेल्या ‘मुक्तीपथ’ अभियानात काम करतो.



            आवडणारं काम जे नैतिक सुद्धा आहे, ते काम करण्यास भीती कसली? कामाला सुरवात करतांना फायद्यातोट्यांचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या दिवसांमध्ये सोशल कामं करतांना त्या कामांचं समाधान मिळत गेलं आणि मी पूर्णवेळ सोशल सेक्टर मध्ये काम करायचा निर्णय घेतला.
            कॉलेज मध्ये माझ्या कामांचे मला काही फायदे झाले. जसे, चांगल्या लोकांसोबत वेळ, अनुभवी मेंटर्स, चांगल्या विचारसरणीचे मित्रं, ‘निर्माणसारखे प्लेटफॉर्म, इत्यादी. एक आधार देणारा लोकसंग्रह एकविसाव्या वर्षातच  मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्राचे मित्रं व त्यांचे वेगवेगळे अनुभव आणि कामाच्या अनुभवांनी बरच नवीन शिकवलं.
            तोट्यांचा खूप जास्त विचार केलाच नाही. माझ्या बऱ्याच इनसेक्युरीटीज ह्या समाजाने लादलेल्या आहेत असे वेळीच लक्षात आले. काही तर सोशल सेक्टर मध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रांच्याच इनसेक्युरीटीज माझ्या डोक्यात घर करून बसल्या होत्या. पण त्याच्यावर विचार केल्यानंतर लक्षात आले कि त्या माझ्या नाहीतच. हो, वडील थोडे नाराज आहेत म्हणून आमच्यात दुरावा निर्माण होणार असली भीती वाटायची. त्या नाराजी पेक्षापण आमच्यात न व्यक्त होणारा जिव्हाळा खूप जास्त आहे हे आता जाणवते. म्हणून दुरावाव्याची भीती संपली. सध्या करत असलेल्या कामामध्ये समाधान तर आहेच सोबतच भरपूर शिकायला पण मिळत आहे.

प्रतिक उंबरकर, निर्माण ६
प्रतिक समाज प्रगती सहयोग या संस्थेत अमरावती येथे रोजगार हमी या विषयावर काम करतो.


इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर आता काय करू हे ठरवताना भीती / चिंता तर नक्कीच वाटली. मी सामाजिक क्षेत्रात काम करायच ठरवल तर मी सेटल होईल का? मी तर इंजिनीअरिंग केलंय, मग आता कशा प्रकारचे काम करू? मग माझ्या करीअर च काय? मी एकटा पडलो तर? आणि सगळ्यात महत्त्वाच घरच्यांना काय सांगू? त्यांची पण जबाबदारी आहे माझ्यावर. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यात निर्माण प्रक्रियेची खूप मदत झाली. माझ्या गरजा किती याच गणित मांडल्यावर, पैशांची वाटणारी चिंता दूर झाली.
मग पुढचा प्रश्न होता, कोणत्या प्रकारचे करीअर निवडू? मी इंजिनीअर आहे, मग ते फील्ड सोडून इकडे येणे कितपत योग्य आहे? गरज कुठे आहे असा प्रश्न विचारून पहिला तर उत्तर आलं, दोन्हीकडे आहे. मग माझ्या सिनिअर निर्माण च्या मित्रांची यात मदत झाली. निखिलेश म्हणतो, “मी घेतलेल्या शिक्षणामुळे माझ्या कामाची कक्षा मर्यादित नाही झाली पाहिजे, तर मला जे करायचं आहे, त्यात मदत झाली पाहिजे. मी इंजिनीअर ‘पण’ आहे.” विक्रम म्हणतो, “माझी worth कशावर ठरते? मला मिळणाऱ्या पगारावर कि मी काम करत असलेल्या challenge वर?” या मित्रांमुळे एकटे पडण्याची भीती पण गळून गेली.
मला वाटणारी भीती मी ‘घरचे नाही म्हणतील’ यामागे लपवत तर नाहीये ना, याची मी माझ्याच मनाशी खात्री करून घेतली. मी ह्या प्रकारचे काम करतोय म्हणजे माझ्या जबाबदाऱ्यांपासून तर दूर पळत नव्हतो. आणि मला वाटत कि एकदा ही गोष्ट पटली कि घरच्यांना पटवणे तुलनेने सोप्पे असते. शेवटी तुम्ही आनंदी असण्यातच त्यांचा आनंद असतो.
आकाश भोर, निर्माण ५



नाही, भीती नाही वाटली, पण थोडी असुरक्षितता वाटली. कारण कॉलेज संपल्यानंतर बऱ्याच जणांचं ठरलेल असत कि कुठं जॉब करायचा, एमपीएससी, युपीएससी करायच ई. पण सोशल सेक्टर मध्ये काम करताना काही ठरलेलं नसते. कामाबद्दलची किंवा पैशाबद्दलची असुरक्षितता असते. आजूबाजूचे संबंधी, नातेवाईक यांना प्रश्नांची उत्तरे देताना फारच दमछाक होते आणि वाटायला लागत खरच मी जो मार्ग निवडला तो योग्य आहे कि नाही.पण हे सुद्धा आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने फारच महत्वाचे असते.
         मूळातच सोशल सेक्टर निवडताना जे निकष असतात त्यात 'पैसे' हे कामा नंतर येणारा भाग असतो, काम महत्वाचे. त्यामुळे फायद्या-तोट्याचे निकष हे आपण करीत असलेल्या कामावरूनच आखल्या जातील. पण पैसे देखील महत्वाचे आहेतच. सामाजिक क्षेत्रात काम करायला आवडते, लोकांसोबत काम करताना मजा येते व समाधान पण मिळते या निकषावरुन फायदे जास्त आहेत. पण गलेलठ पगार नाही किंवा मुंबई, बेंगलोर सारख्या ठिकाणी फ्लॅट नाही किंवा महागडी गाडी नाही ह्या भौतिक सुखाचे निकष समोर आणले कि वाटते कि काही चुकतंय का आपलं. स्वताहून स्वतःच्या विकासावर अडथळा केला नाही ना असे वाटायला लागते.
पण स्वतःच्या गरजा defined केल्या तर सामाजिक क्षेत्रात, विकास क्षेत्रात काम करण्यात काहीच तोटे नसतात.
रवींद्र चुनारकर, निर्माण ६
रवींद्र शिक्षणाने इंजिनिअर आहे व सध्या पालघर येथील वयम या संस्थेत काम करतो.

साधना, कुणाल, राजू आणि अमोल यांची उत्तरे येथे वाचता येतील.

No comments:

Post a Comment