'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 27 June 2016

I need some water to sprout

I need some water to sprout

In this dreary deadly summer,
I am alive because my hopes are
the hot heat waves are burning my leaves and flowers
but I am alive because I hope in future, there will be showers
A day will come when I will be the witness of baby sparrow's first chirp
by getting my sweet fruits, the little squirrel will burp
I will decorate myself with the long and beautiful tender vines
and will look gorgeous after having bird nest of serene design
The twigs of mine will make the shelter to the poor
travelers will take afternoon nap in my shadow for hours
despite all the adversities against my survival I believe in my dream
because my dreams are my life and my life is my dream
                                                                                - Sagar Kabra
मे २०१६ च्या दिवशी बिलासपूर (छत्तीसगढ) जवळ सागर-नेहा-पंकज या आपल्या मित्र मैत्रिणींचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघाताने सागरला आपल्यातून नेले. नेहा व पंकज जखमी झाले. या कठीण प्रसंगानंतर दोघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरण्याचा धैर्याने प्रयत्न करत आहेत.
            मूळ मानवतचा (जि. परभणी) सागर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यासासोबत आपण समाजासाठी काय करू शकतो या शोधात त्याने मेळघाटच्या आदिवासी पाड्यांतील बालमृत्यू कमी करण्यासाठी धडक मोहीम गाठली. पुढे सलग सहा वर्षे त्याने धडक मोहिमांचे काम नेटाने केले. याचदरम्यान निर्माणच्या तिस-या बॅचमध्ये सागर आला. सागर-धीरज-पवन हे कॉलेजमधील घनिष्ठ मित्र निर्माणच्या शिबिरांतही उठून दिसत. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोचवण्याबद्दल त्यांची कळकळ, धडाडी यामुळे शिबिरात सकारात्मक वातावरण अगदी कायम राहात असे.
            डॉक्टर झाल्यावर सागरने छत्तीसगडमधल्या गाणियारी येथील 'जन स्वास्थ्य सहयोग' या आदिवासी, दुर्गम भागातल्या दवाखान्यात आरोग्यसेवा देणं सुरू केलं. यादरम्यान अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची क्षमता मिळवण्यासाठी त्यानं उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आपलं संपूर्ण आयुष्य ग्रामीण रूग्णसेवेसाठी द्यायचे सागरने ठरवले होते. ग्रामीण भागात जायला आधीच कमी डॉक्टर तयार होतात. ग्रामीण भागात लोक आपल्या भागात कोणत्या स्पेशलायझेशनचे डॉक्टर आहेत हे पाहून आजारी पडत नाहीत. जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यायची तर शरीराच्या एखाद्या अवयवावर स्पेशलायझेशन करून नाही चालणार. त्यामुळे सागरने 'जन स्वास्थ्य सहयोग' येथेच स्पेशलायझेशन इन जनरलायझेशन म्हणजे फॅमिली मेडिसीन या वलयांकित नसलेल्या शाखेत प्रवेश घेतला.
            रूग्णांबद्दल अतिशय संवेदनशील असणारा सागर रूग्ण तपासणी करताना त्यांचे बोलणे समवेदनेने ऐकून घेई. हसतमुख, रूग्णाचे ऐकणारा आणि सक्षम डॉक्टर – अतिशय दुर्मिळ आणि रूग्णांना दिलासा देणारे combination! आरोग्यसेवेसंबंधी लोकांवर होणारा अन्याय त्याला अस्वस्थ करीत असे. सर्वांना आरोग्यसेवा मिळावी असे त्याचे स्वप्न होते. आपले अनुभव, अस्वस्थता, स्वप्ने त्याने अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहेत. ते नक्की वाचा -
            निर्माणच्या अनेक तरूण डॉक्टरांनी ग्रामीण भागात एक वर्ष आरोग्यसेवा देण्याचा निर्णय मागच्या महिन्यात घेतला. सीमोल्लंघनमध्ये ही बातमी वाचून सागरने १ मे ला त्यातल्या काही जणांना फोन केला. सागरला आधी कधीही न भेटलेल्या अमित ढगेला सागरचे कौतुकाचे शब्द ऐकून भरून आले. सागरने अमितच्या निर्णयाचे कौतुक केले, त्याच्यासोबत ग्रामीण भागात आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव शेअर केले. Medico Friends Circle च्या धर्तीवर आपणही सामाजिकदृष्ट्या सक्रीय डॉक्टरांचा गट बनवू असे सागरने सुचवले. सागरने पेरलेले बी आपले डॉक्टर मित्र नक्कीच वाफवतील.

            आज सागर आपल्यात नाही. पण आपल्या सर्वांच्यातच एक सागर आहे. सागरच्याच वरील कवितेप्रमाणे आपल्यातला सागर अंकुरण्यासाठी त्याला काळजीपूर्वक व प्रयत्नपूर्वक पाणी घालूया.

स्वाभिमान रोजगार योजना....

नरेगा (रोजगार हमी योजना) मधून करता येणा-या जलसंधारणाच्या कामांपैकी एक काम म्हणजे शेततळे. शेतकऱ्याचा दृष्टीने एक महत्वाचे साधन. पावसाळ्यामध्ये जर पाऊस अनियमित झाला तर याच शेततळ्याच्या मदतीने शेतकरी आपल्या पिकाला पाणीपुरवठा करू शकतो. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर काही महिने शेततळ्यामध्ये साठवलेल्या पाण्याच्या मदतीने तो शेतामध्ये अन्य पीक घेऊ शकतो. या शेततळ्यामध्ये मासेपालनासारखा जोडधंदा करून अधिक उत्पन्न घेता येते. जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचे कामही शेततळे करते. विहीरींच्या वरील भागात जर शेततळी झाली असतील तर विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
अशा प्रकरे शेतकऱ्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शेततळ्याची कामे नरेगा मधून मात्र फार कमी प्रमाणात घेतली जातात. शेततळे घेण्यासाठी योग्य अशी जमीन नसणे, त्याचप्रमाणे लोकांना पडणारा कमी रोज अशी अनेक कारणे यासाठी दिली जातात. 'मागेल त्याला शेततळे' या शासनाच्या योजनेमध्येसुद्धा काही तालुक्यांमध्ये दिलेले उदि्दष्ट पूर्ण झाले नसल्याची बातमी वाचण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आपला मित्र मकरंद दीक्षित, त्याचे काही सहकारी व प्रगती अभियान, यांनी खाजगी निधीतून शेततळे करण्याचा एक उपक्रम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये राबवण्याचे ठरवले. या उपक्रमाचे वैशिष्ठ्य असे की, जरी खाजगी निधीमधून काम होत असले तरी त्याचे कामाचे निकष हे नरेगा प्रमाणे होते; म्हणजेचहोणारे काम हे नरेगाच्या नियमाप्रमाणे होईल, मात्र निधी खाजगी वापरला जाईलअशी उपक्रमाची आखणी होती.

आम्हा सर्वांसाठीच हा एक वेगळा अनुभव होता. कारण आत्तापर्यंत केवळ शासनाने केलेली कामे बघत आलो होतो, तर आता योग्य प्रकारे कामाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची होती. नरेगाच्या नियमाप्रमाणे जागा निश्चित करुन शेतकऱ्यांची परवानगी घेण्याच्या कामापासून ते वेळेवरती मजूरीची रक्कम देण्यापर्यंत सर्व कामे आम्हाला करावयाची होती.
हे काम म्हणजे आमच्यासाठी एक परीक्षाच होती. काम योग्य प्रकारे आणि विनाअडथळा करून दाखवणे आवश्यक होते. कारण यातून प्रशासनासमोर त्याचसोबत तालुक्यातील सर्व गावांसमोर एक उदाहरणच प्रस्थापित होणार होते. शेततळ्याची कामे करण्याची आदर्श पद्धत समोर येणार होती. नियोजनपूर्वक काम केल्यासनरेगा मधून शेततळ्याचे काम चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतेहे यातून दिसून येणार होते आणि त्याचा परिणाम तालुक्यातील इतर गावांमध्ये दिसण्याची शक्यता होती.
या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायतीशी सुसंवाद साधणे, मजूर व रोजगार सेवक यांना मार्गदर्शन करणे, कामावरती देखरेख करणे, काही अडचणी आल्यास त्या सोडवणे अशा प्रकारची कामे ठराविक वेळेत पार पाडावी लागतात. गावातील गरजू व्यक्तीचा शोध घेणे हे यातील महत्वाचे काम होते. कारण व्यक्ती निवडताना अशी निवडायची होती की ती व्यक्ती खरच गरजू असावी आणि त्या व्यक्तीचे नाव नरेगाच्या कृती आराखड्यामध्ये नसले पाहीजे. (‘ज्याला शेततळ्याची गरज आहे पण त्याचे नाव नरेगाच्या आराखड्यामध्ये नाहीअसा माणूस आम्हाला मिळणे म्हणजे कृती आराखडा अपूर्ण असण्याचा एक प्रकारे दाखलाच होता. असो..)
ऊत्स्फूर्त सामाजिक सहकार्याअंतर्गतस्वाभिमान रोजगार योजनाया नावाने देवगाव, चिंचओहोळ, हिर्डी व कोटमवाडी या चार गावांमध्ये प्रत्येकी एका शेततळ्याचे काम यशस्वीरित्या करण्यात आले. यातील प्रत्येक शेततळे हे 10*10*3 मी. (10 मीटर लांब 10 मीटर रुंद 3 मीटर खोल ) या मापाचे होते. या चार शेततळ्यांच्या कामातून जवळपास 102 मजूरांना एक आठवड्याचा रोजगार उपलब्ध झाला आणि सरासरी २०० ते २१५ रूपयांपर्यंत रोज मिळाला. हिर्डी या गावातील मजूरांना २८४ रुपये तर कोटमवाडी येथील मजूरांना ३०० रुपये रोज मिळाला. नरेगामध्ये कामानुसार रोज मिळतो. त्याचनुसारच प्रत्येक कामाचे मोजमाप होऊन त्याप्रमाणे मजूरी दिली गेली.
जलसंधारणाच्या दृष्टीने विचार केला तर वरील मापाच्या एका शेततळ्यामध्ये अंदाजे १ लाख ७५ हजार लिटर पाण्याची साठवण होवू शकते. चार शेततळी मिळून अंदाजे ७ लाख लिटर पाणी, म्हणजे लातुरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका वेळेस जेवढे पाणी नेले जाते तेवढे पाणी या शेततळ्यांत साचणार आहे. लातुरला एका वेळी पाणी वाहून नेण्याचा खर्च कोटीच्या घरात आहे आणि ही शेततळी बांधाण्यास आलेला खर्च मात्र १ लाख २७ हजार रुपये एवढा आहे.
पावसाळ्यानंतर अर्धा एकर जमिनीवरती शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो, शिवाय मासेमारी सारखा व्यवसाय करू शकतो. किंवा येथील जनावरांना पिण्यासाठी हे पाणी पुरणार आहे. शिवाय ही निरंतर वापरता येणारी संसाधने आहेत ज्यात हे पडणारे पाणी हे दरवर्षीच्या पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात साचणार आहे, जमिनीत मुरणार आहे.

लोकांनी लोकांचा लोकांसाठी राबवलेलाहा एक उपक्रम आहे. ही कामे बघून अजून शेततळी करण्याची मागणी गावांमधून येण्यास सुरूवात झाली आहे. शेततळ्यांसोबतच इतर कामेसुद्धा करता येतील का? अशी विचारणा गावातील रोजगार सेवकच करू लागले; हेही या उपक्रमाचे यशच म्हणता येईल.
यातून एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली, की गावातील मजूर आणि रोजगार सेवक यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नरेगा चांगल्या प्रकारे राबवता येवू शकते!
निखिल अरुण मुळ्ये (निर्माण ५), 

मकरंद दीक्षितने या कामाबद्दल लिहिलेला विस्तृत लेख 'लोकप्रभा'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो येथे वाचू शकता - http://www.loksatta.com/vishesha-news/private-rojgar-hami-yojana-1242519/

डॉक्टर - जिथे गरज आहे तिथे...

सोलापूर च्या शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुजाता व शिवाजी या दोघांनीही आपला बाँड पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, आणि आदिवासी / ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्याच शब्दात...

निर्माण ६.२ शिबिरामध्ये नायनांच्याआरोग्य स्वराज्यया सेशन नंतर एक डॉक्टर म्हणून काम करण्याची क्षमता तपासण्यासाठी माझ्या वैद्यकीय शिक्षणानंतर (UG नंतर) MOship करणं हा माझ्या करिअरचा महत्त्वाचा भाग आहे हे जाणवायला लागल होतं. पुढे वर्षभर सगळे विरोध करत असतानादेखील मी या निर्णयावर ठाम राहिले. सोलापूरमध्ये एक वर्ष केलेल्या इंटर्नशिपचा आता खूप फायदा होत आहे. मी हायपरटेन्शन, डायबिटीजचं (स्क्रीनिंग व उपचार, तसेच गरज असल्यास रेफरल) अस काम सुरु केलंय.
तुम्ही DP ची गोळी (BP ची गोळी) सुरू केल्यापासून बरं वाटतंय, हे तुमच्यासाठी आणलंयअसं म्हणत पेशंटने फणसाचे गरे मला दिले. मी भारावून गेले. महिला पेशंट म्हणतातमॅडम, बरं झालं तुम्ही आलात, आता मोकळेपणाने बोलता येतंहे सगळ ऐकून मला खूप बर वाटतं, उत्साह येतो. येत्या दिवसात खूप शिकायला मिळणार आहे. सरकारी योजनांचं काम जवळून पाहण्याची त्यांच्यासोबत काम करण्याची चांगली संधी मला मिळाली आहे.
सुजाता पाटील, (निर्माण ६)
PHC, खानापूर, ता. हवेली, जिल्हा पुणे

मी इंटर्नशिपनंतर MOship करेल असं कधी वाटलं पण नव्हतं. म्हणजे तसा कधी मी विचार पण केला नव्हता. पण जशी जशी इंटर्नशिप संपत आली तशी माझी MOship करण्याची किंवा त्याबद्दल विचार करण्याची मनाची तयारी झाली. सुरूवातीला वाटलं MOship नाही करायची आत्ता, अभ्यास ठीक सुरु आहे, तर तो तसाच सुरू ठेवू आणि PG ची तयारी करू. पण नंतर अचानक मन बदललं, घरी विचारलं आणि घरच्यांनी पण या निर्णयाला पाठींबा दिला. मी गडचिरोलीला येईल अस स्वप्नात पण वाटलं नव्हतं. दिग्विजयमुळे इकडे येण्याचा निर्णय घेतला. आम्हाला सोबत काम करायचं होतं, पण पोस्टिंग एकाच ठिकाणी मिळाली नाही. दोघेही नाराज झालो, पण आता काहीही झालं तरी अर्ध्यातून सोडून जायचं नाही अस ठरवलं.
सुरवातीचा एक आठवडा खूप अवघड गेला, जेवणाची नीट सोय नव्हती आणि इकडे लोकांशी जुळवून घ्यायला वेळ लागला. पण नंतर आपला निर्णय चुकला नाही आणि आपण योग्य जागी जिथे गरज आहे तिथे काम करतोय हे जाणवायला लागलं. आता मी इथलाच झालो आहे. गडचिरोली जिल्हा खूप डेंजर आहे असं ऐकलं होतं, त्यामुळे सुरवातीला घरून थोडा विरोध झाला; पण माझे वडील मला भेटायला आले, आणि त्यांना पण धानोरा खूप आवडला. माझ्याकडे सांगण्यासारखे खूप अनुभव आहेत, ऐकायला तुम्ही माझ्या धानोऱ्यात नक्की या.
शिवाजी खोसे,
(Rural Hospital, धानोरा, जिल्हा गडचिरोली)