'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 1 November 2014

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

निर्माण ६ येत आहे...
गेले दोन-तीन महिने सुरू असणारी निर्माण ६ ची निवडप्रक्रिया अखेर पूर्ण झाली. Concern (सामाजिक समस्यांविषयी तळमळ), Drive (त्या समस्यांवर काम करण्यासाठी धडपड करण्याची तयारी) आणि Talent (त्या समस्या सोडवण्याची क्षमता) हे निवडीचे मार्गदर्शक निकष होते. निर्माण ६ करिता महाराष्ट्राच्या २९ जिल्ह्यांतून ४२६, तर महाराष्ट्राबाहेरून १० अर्ज आले होते. यांपैकी ३०७ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील १६४ जणांची (मुले-९४, मुली ७०) निवड निर्माणच्या शिबिरांसाठी झाली आहे. या बॅचमध्ये नुकतेच बारावी झालेला मुलगाही आहे. त्याचप्रमाणे BAMS, MA, LLB इ. शिकून पोलीस खात्यात असणारा व दोन पुस्तकांचा लेखक असणारा मुलगाही आहे. या बॅचचे सरासरी वय २२ वर्षे असल्याने सरासरी ३५ वय असणाऱ्या आमच्या निर्माण कार्यकारी टीमला खूप उत्साहाचे भरते आले आहे.
मुलाखतींदरम्यान तुमच्यापैकी अनेक जणांना खूप महिन्यांनी भेटता आले. अनेकांनी मुलाखतींच्या आयोजनाची किचकट  जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. अनेक जण सुट्टी घेऊन मुलाखती घ्यायला आले. मुलाखतींसाठी आपली घरे-दारे उघडी करून दिली. पावसाची पर्वा न करता ऐन वेळी करावी लागणारी पळापळ केली. आमच्या टीमला जेवू घातले. तुम्ही नसताना तुमच्या आई-बाबांनीही खूप मदत केली. सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद!

सीमोल्लंघनला तीन वर्षे पूर्ण...
निर्माण शिबीरे झाल्यानंतर सीमोल्लंघन आपल्याला जोडून ठेवते. २०११ दसऱ्याच्या निमित्ताने निर्माणच्या युवांचे धाडस इतरांपर्यंत पोचवण्यासाठी सीमोल्लंघनचा उपद्व्याप सुरू झाला. त्याला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे धाडस करत राहून बातम्या निर्माण करणाऱ्या तुम्हा सर्वांचं, या बातम्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढणाऱ्या पत्रकारांचं, प्रामाणिकपणे आपले चढ-उतार शेअर करणाऱ्यांचं, सर्वांचे शिक्षण व्हावे म्हणून स्वानुभव - पुस्तक परिचय – वैचारिक लेख – वैचारिक कविता पाठवणाऱ्या मित्रांचं - मार्गदर्शकांचं, तणावपूर्ण वातावरणात हसवणाऱ्या व्यंगचित्रकार व छायाचित्रकारांचं मनापासून अभिनंदन !

चौथा ऑक्टोबर वर्कशॉप, वर्ष २०१४
   
         सालाबाद प्रमाणे निर्माणची ऑक्टोबर कार्यशाळा ९ ते १२ ऑक्टोबर २०१४ दरम्यान सर्च, शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. निर्माणची शिक्षण प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेचे हे चौथे वर्ष! तीन दिवसांच्या या हृद्य अनुभवाबद्दल शिबिरार्थीनी दिलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया –

            “निर्माणच्या शिबिरांमधून मिळणारी उर्जा आणि उत्साह शब्दात पकडण अवघड आहे. या वेळच्या ऑक्टोबर कार्यशाळेतले बहुतांश चेहरे मला नवीन होते.पण प्रत्येकाचा प्रवास ऐकल्यावर अस वाटलं की मी या सगळ्यांना खूप पूर्वीपासून ओळखते.प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, वाट वेगळी, अडचणी वेगळ्या, आणि तरी सगळे एकमेकांचे सोबती...
            ‘विकास’ म्हणजे काय? आणि विकास कोणासाठी? याचा विचार न करता विकासाची स्वप्न बघणाऱ्यांच्या गर्दीत वास्तवच भान असलेला हा कोपरा मला तरी खूप सुरक्षित वाटला.”
अमृता प्रधान, निर्माण २
         
            “ही माझी पहिलीच ऑक्टोबर कार्यशाळा होती. कॅम्पला येण्याआधी नुकताच जॉब सोडला होता. त्यामुळं ‘फिअर ऑफ फ्रीडम’ अशा काहीशा मनस्थितीत होतो. इथे निर्माण प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे मित्र एकाच वेळी भेटले. त्यांचं काम, त्यांच्या अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, त्यांच्या प्रेरणा, निराशा, काहींच फोकस्ड असणं, तर काहींच भरकटणं, यातून बरच काही शिकता आल. निर्माणवाल्यांचा प्रवास साधारणपणे कसा असतो याच एक चित्र तयार झालं. कॅम्प संपताना अस वाटत होतं की ‘देवाच्या दयेने भरपूर स्वातंत्र्य मिळत आहे तर ते नाकारण्याचा नाकर्तेपणा करू नये, ते नीट वापरावं.’ ”
निरंजन तोरडमल, निर्माण ५

                “हा माझा पहिला ऑक्टोबर वर्कशॉप. ग्रामीण भागात काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव असल्याने शिबिरात झालेलं ‘सामाजिक क्षेत्रात कामाचे मूल्यमापन का आणि कसे करावे?’ हे सेशन (माझ्यासाठी) फार उपयोगी होतं. मी (सध्या) जे काम करत आहे तसच काम निर्माणचे बरेच मित्र-मैत्रिणी करत आहेत. शिबिराच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि त्याचं काम, कामाची पद्धत समजून घेता आली. त्यांच्या अनुभव कथनातून आणि केलेल्या प्रयोगांमधून मला माझ्या कामाकडे विविध अंगांनी बघण्याची दृष्टी मिळाली.
कामाच्या धावपळीत सर्चची ही भेट आणि शेअरिंग ‘एनर्जी बूस्टर’ होती. अम्मा, नायना, आणि सर्व निर्माणींना भेटून अजून जोमाने काम करण्याची उर्जा मिळाली.”

कल्याणी राऊत, निर्माण ५

“आधी कंपन्या बंद करा...”

गडचिरोली तंबाखूमुक्ती अभियाना अंतर्गत जनजागृतीसाठी निर्माणच्या व निर्माणमध्ये येऊ घातलेल्या युवांनी एक आठवडा दिला. बस स्टँड, शाळा, खेडी इ. ठिकाणी जागृतीचे काम करताना या मुलांचा थेट वास्तवाशी सामना झाला. यानंतर प्रतीक वडमारेच्या (निर्माण ६) मनात काय तरंग उमटले?


बस स्टँडवर पोस्टर प्रदर्शनीसह प्रतीक
            महाराष्ट्रात जो तंबाखू बंदीचा कायदा झालाय त्या कायद्याबद्दल लोकांना सजग करण्यासाठी SEARCH आणि इतर काही शासकीय आणि अशासकीय संस्थांच्या वतीने "तंबाखू मुक्त गडचिरोली " अभियान राबवण्यात आल. त्यात भाग घेण्यासाठी २४ ऑगस्टला गडचिरोलीला गेलो होतो . २ दिवसांच्या ट्रेनिंगनंतर आम्हा मुलांचे २-२ चे गट करून प्रत्येक गटाला ४ गावे याप्रमाणे गावे विभागून करण्यात आली होती.
आम्हाला दिलेल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही शाळांमध्ये कार्यक्रम घेतले, गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, लोकांची मते जाणून घेतली. प्रत्येक गावात आम्ही जेंव्हा तंबाखूच्या दुष्परिणामांची, कायद्याची माहिती लोकांना द्यायचो त्यावेळी बहुतांश लोकांचा एकाच सूर असायचा,आधी कंपन्या बंद करा! दरवेळी समोरच्याला ओरडून सांगाव वाटायच “अरे, उद्या कंपन्यावाले पानठेल्यांवर विष विकायला लागले तर तू तेही विकत घेणार आहेस का
s s s (पण मी असं काही कोणाला बोललो नाही ). चौथ्या दिवशी तर मी इतका वैतागलो होतो की मला आणखी एकदा कोणी म्हणाला असता की कंपन्या बंद करा तर विचारू नका काय केल असत मी त्याच...
            या अभियानाच्या निमित्ताने समाजसेवा/ सुधारणा हा काय भयानक (चांगल्या अर्थाने ) प्रकार आहे हे कळले. आजवर फक्त पुस्तकात समाज सुधाराकांबद्दल  वाचल होतं. पण समाजातील कुठल्याही वाईट गोष्टीवर बोट ठेवताना त्यांना काय दिव्य करावं लागत असेल याची थोडीफार प्रचीती आली. लोकांमध्ये तंबाखूबद्दल अज्ञानच इतक होतं की तंबाखू खाणं चुकीचं आहे हेच त्यांच्या गावी नव्हतं. गावांमध्ये मुलाला दुधाचे दात आले के त्याने तंबाखू खाणं नॉर्मल समजतात. सुशिक्षित आणि त्यातल्या त्यात तंबाखू न खाणाऱ्याचं प्रमाण कमीच.
            या ४ दिवसांमध्ये positive response देणारेही लोक भेटले. शाळा ,कौलेजमधील मुलांचा छान प्रतिसाद मिळाला. आम्ही तंबाखू सोडू, आमच्या मुलांना देणार नाही असं म्हणणारे लोकही भेटले. काही मोजक्या लोकांनी आमच कौतुकही केल. पण जर सुरुवात लोकांच अज्ञान घालवणे, त्यांचे समज बदलण्यापासून असेल तर या कामासाठी खूप वेळ लागणारेय हे नक्की. अर्थात अशा एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाने लोक तंबाखू खाणे सोडतील अशी अपेक्षा करता नाही येणार, पण शाळा, कॉलेज मधील मुलांनी कमीत कमी या निमित्ताने तंबाखू वाईट आहे हा विचार केला तरी मी याला या अभियानाच यश समजतो.
            या अभियानाच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. डॉ. अभय बंग यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. निखिल, अमृत आणि SEARCH मध्ये काम करणाऱ्या इतर तरूण मित्रांना जवळून पाहता आलं. स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून स्वतःच स्वतःवर घातलेल्या मर्यादा ओलांडल्यामुळे एकंदरीतच स्वतःकडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. स्वतःला फाsssर सिरीअसली घेण्यात काही अर्थ नाही हे पुन्हा एकदा नव्याने कळलं..
            मी गडचिरोलीला गेलोय म्हणल्यानंतर जनरली लोकांच अस मत होतं / होईल की मी पण लागलो समाज सेवेच्या नादाला. पण मला मुळात समाज सेवा हा प्रकारच पटत नाही. मी काहीतरी मोठा त्याग करून समाजासाठी काहीतरी करतोय ही भावनाच मला मुळात पांचट वाटते (कदाचित यातूनच मी समाजाचा मालक असल्याची भावना आपल्या नेत्यांमध्ये येत असावी असही मला वाटतं) समाजासाठी कोणी काही करत नसतं या मताचा मी पक्का आहे.
            असो परत आल्यानंतर मला सगळ्यांना (त्यातल्या त्यात माझ्या मित्रांना ) आवर्जून सांगावं वाटत होतं बेट्यांनो भाग घ्या या मोहिमेमध्ये or at least go through the selection procedure of NIRMAN, you might find a whole new world waiting to be explored...
प्रतीक वडमारे, pratikwadmare@gmail.com
(अभियांत्रिकीची पदवी घेतलेला प्रतिक मूळ अंबेजोगाईचा आहे. त्याची निर्माण ६ साठी निवड झाली आहे.)