'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday 11 August 2013

वारकऱ्यांतला विठ्ठलाची आरोग्यसेवेसाठी साद



आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक. संत ज्ञानेश्वर पालखी व संत तुकाराम पालखीसोबत दरवर्षी सुमारे १०-१२ लाख वारकरी आळंदी व देहू येथून चालत चालत आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचतात. अंतर मोठे असल्याने वारकऱ्यांना हमखास अशक्तपणा, पाय दुखणे, बूट चावून पायाला जखमा इ. समस्यांसोबतच अतिसार, जुलाब व इतर संसर्गजन्य रोगांना तोंड द्यावे लागते. त्यांची वैद्यकीय गरज पूर्ण करण्यासाठी सह्याद्री मानव सेवा मंच ही स्वयंसेवी संस्था दरवर्षी तपासणी व उपचार शिबीरे घेत  असते. प्रणव नाफडे (निर्माण ४) या संस्थेसोबत २००८ पासून कार्यरत असून शिबीर आयोजनात (कॅम्प लावणे, प्रवास, सामान पोचवणे, जेवण) त्याची जबाबदारी तो दरवर्षी पार पाडतो. प्रणव इंजिनियर असला तरी प्रथमोपचार, तसेच स्नायूंमध्ये इंजेक्शन देणे इ. कौशल्ये शिकला आहे. 
यावर्षी ९ डॉक्टर्स, १ डेंटिस्ट, १० नर्स व २५ स्वयंसेवक अशा टीमने ज्ञानेश्वर पालखीच्या मार्गात दिवेघाट-सासवड (जि. पुणे) येथे उपचार व तपासणी शिबीर घेतले. तसेच अकलूज-माळशिरस (जि. सोलापूर)या भागात ३-४ दिवस ज्ञानेश्वर आणि तुकाराम अशा दोन्ही पालखींच्या मार्गात शिबीरे घेतली. शिबिरांविषयी बोलताना प्रणव म्हणाला, “एका दिवशी शिबिरात सरासरी ५-१० हजार वारकरी तपासणीसाठी येतात. दिवसाला साधारणपणे १५०० इंजेक्शने देण्याची व तब्बल ४०० वारकऱ्यांना सलाईन लावण्याची गरज भासते. अनेकदा गंभीर परिस्थितीतही रुग्ण शिबिरात दाखल होतात. दरवर्षी ५-६ फ्रॅक्चरचे रुग्ण हमखास येतात. मात्र त्याही परिस्थितीत ते पंढरपूरला जायला निघतात. त्यांचा उत्साह पाहून आम्हालाही उत्साह येतो.

वारी ही अतिशय गतिमान प्रक्रिया. वारीतील रुग्णतपासणी हे दवाखान्यातील रुग्णतपासणीपेक्षा फार वेगळे आव्हान आहे. इतक्या गर्दीत शिबिराचे आयोजन करणे हे रुग्णतपासणी करण्याइतकेच गुंतागुंतीचे व आव्हानात्मक काम. यासाठी सह्याद्री मानव सेवा मंचला तरुण, उत्साही स्वयंसेवकांची गरज भासते. याशिवाय सह्याद्री मानव सेवा मंच दर महिन्यात ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातही आरोग्य शिबिरांचे आयोजन करतो. या दोन्ही कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रणव नाफडेशी संपर्क साधा.


स्त्रोत- प्रणव नाफडे, pran.296@gmail.com

No comments:

Post a Comment