'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 10 July 2013

एक कोटी मृत्यूंचे कारण काय?


आकडेवारी हेच सत्य असते. पूर्वाग्रहाचा चष्मा लावून काढलेले निष्कर्ष हे पूर्ण सत्य कधीच नसते. ती बहुतेक त्या व्यक्तीची मते असतात. हा अहवाल वाचून तुम्हाला सत्याची कोणती बाजू उमजली? जरूर सांगा. डॉक्टर मित्रमैत्रिणींसाठी ही एक ज्ञानाची खाण आहे. जेवढे तीतून काढू तेवढे कमीच आहे. कशावर, का, कुठे, कोणासोबत काम करावे हे सांगणारे ते गाईडच आहे. अवैद्यकीय मित्रांनी नाराज व्हायचे काहीच कारण नाही. आपल्याला verbal autopsy चे शक्तीशाली साधन तर मिळाले ! कशी सुरुवात करू म्हणून रडत बसायचे कारण नाही. एखादा प्रश्न घेऊन त्याची verbal autopsyने कारणे शोधायला आजच सुरुवात करू शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या? रस्त्यावर वाहनांचे अपघात का झाले? सर्प/विंचूदंश कशामुळे झाले? एखादी सरकारी योजना अपयशी ठरायचे कारण काय होते? रोजगार हमीद्वारे काम मिळण्यामध्ये अडचणी कोणत्या आल्या? महिलांवर अत्याचार होण्याची कारणे कोणती होती? एखाद्या सरकारी कार्यालयात कुठे, किती भ्रष्टाचार झाला? आपल्या गावापासूनच आजच सुरूवात करू शकतो. करायची का?


भारतात दरवर्षी सुमारे एक कोटी मृत्यू होतात. पुढच्या जनगणनेतील लोकसंख्येची आकडेवारी बदलण्यापलिकडे या मृत्यूंचे काही महत्त्व आहे का? हे मृत्यू कुणाचे होत असावेत? कशामुळे होत असावेत? ते थांबवता येऊ शकतात का? आपल्या देशात नव्याने कोणत्या रोगाची साथ तर नाही आली? (१९८०च्या दशकात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तरुण पुरुषांमध्ये प्रतिकारशक्तीशी संबंधित मृत्यूंचे प्रमाण अचानक वाढलेले आढळले. ही अमेरिकेतील HIVच्या साथीची नांदी होती.) विविध कार्यक्रमांवर जो वारेमाप पैसा आपले सरकार खर्च करते, त्या कार्यक्रमांचा खरंच परिणाम होत आहे का? या अनेक प्रश्नांची उत्तरे ही मृत्यूंच्या कारणात दडलेली असतात. ठराविक अंतराने मृत्यूच्या कारणांसंबंधित नोंदीं या आपल्या आरोग्यव्यवस्थेचा आरसाच आहेत. आपली आरोग्यविषयक नीती बदलण्याची व पुढील दिशा ठरवण्याची जबरदस्त क्षमता या कारणांमध्ये आहे.
मात्र भारतातले बहुतेक मृत्यू (> ७५%) हे इस्पितळात न होता घरात होतात. त्यामुळे या मृत्यूंची कारणे कोणतीही नोंद न होता सामान्यपणे मारणाऱ्या माणसासोबत नाहीशी होतात. घडून गेलेल्या मृत्यूच्या कारणांची माहिती कशी मिळेल? शवविच्छेदन (autopsy) करून मृत्यूचे कारण कळू शकते हे आपण वाचलं/ऐकलं/टीव्हीवर पाहिलं असेल. आपल्या काही डॉक्टर मित्रांनी शवविच्छेदन केलंही असेल. मात्र एवढ्या मृत्यूंवर नजर ठेवून मृत्यू झाल्या झाल्या त्याचे शवविच्छेदन करणे शक्यही नाही आणि परवडणारे तर नाहीच नाही. सुदैवाने हा प्रश्न सोडवण्यासाठी verbal autopsy (तोंडी शवविच्छेदन) चे साधन उपलब्ध आहे व ते उत्तरोत्तर विकसित होत आहे. कशी असते ही verbal autopsy ची पद्धत?
Verbal autopsy द्वारे मृत्यूच्या कारणांचा अभ्यास Sample Registration System (SRS) या ठराविक कालावधीने जन्म-मृत्यूंची नोंद ठेवणाऱ्या सर्व्हेअंतर्गत करण्यात येत आहे. या अभ्यासात पूर्ण वेळ काम करणाऱ्या अवैद्यकीय कार्यकर्त्यांना verbal autopsy चे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार या कार्यकर्त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांकडून व अन्य खात्रीलायक सूत्रांकडून मृत्यूच्या आधी घडलेल्या घटनांची स्थानिक भाषेत सविस्तर नोंद केली. याशिवाय त्यांनी महत्त्वाच्या रोगाच्या लक्षणांसंबंधित प्रश्नांच्या उत्तरांचीही नोंद केली. प्रत्येक मृत्यूच्या verbal autopsy च्या नोंदी १३० प्रशिक्षित डॉक्टरांपैकी randomly निवडलेल्या २ डॉक्टरांकडे पाठवल्या गेल्या. या नोंदींचा आधार घेत दोघांनीही स्वतंत्रपणे मृत्यूचे कारण निश्चित केले. दोघांची सहमती न झाल्यास ‘मृत्यूचे हेच कारण का निश्चित केले गेले’ याबाबत दोघांना एकमेकांच्या notes दिल्या गेल्या व दोघांना पुन्हा एकदा मृत्यूच्या कारणाबाबत निर्णय द्यायला सांगण्यात आले. तरीही सहमती न झाल्यास एका वरिष्ठ डॉक्टरने अंतिम निर्णय दिला.  ह्या अभ्यासाबद्दल अधिक विस्ताराने जाणून घेऊ.
SRS सर्व्हे नेमका कुणाचा केला जातो? यात भारतातील २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश यातील १.१ दशलक्ष कुटुंबांतील (लोकसंख्या सुमारे ६.३ दशलक्ष) जन्म-मृत्यूंची नोंद ठेवली जाते. (१२० कोटी लोकांची नोंद ठेवणे व्यावहारिक कारणांमुळे शक्य नसते. त्यामुळे ६.३ दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवरून १२० कोटी लोकांच्या आकडेवारीचा अंदाज केला जातो.) ही सर्वच्या सर्व कुटुंबे केरळ किंवा झारखंडमधून घेतली तर? ही आकडेवारी काही देशाचं प्रतिनिधित्व नाही करू शकणार. त्यामुळे १९९१ च्या लोकसंख्येनुसार भारताला १००० लोकसंख्या असलेल्या १ दशलक्ष तुकड्यांत विभागले गेले. त्यातील ६,६७१ तुकड्यांची निवड या सर्व्हेसाठी यादृच्छिक पद्धतीने (randomly) करण्यात आली. ही निवड randomly केली असल्यामुळे यात ग्रामीण-शहरी, आदिवासी-गैरआदिवासी, प्रगत-बिमारू राज्यांतील अशा संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुटुंबांचा समावेश होण्याची शक्यता वाढते. २००२ नंतर SRSच्या कार्यकर्त्यांनी दर ६ महिन्यांनी या तुकड्यांना भेट देऊन घडलेल्या प्रत्येक मृत्यूच्या verbal autopsyची नोंद घेतली. २००१-०३ दरम्यान झालेल्या १,२३,००० मृत्यूंची कारणे निश्चित करून त्यांचा उपयोग भारताच्या आकडेवारीचा अंदाज येण्यासाठी करण्यात आला. काय मिळाले या सर्व्हेतून? काही ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे:
·       भारतात कमी वयाच्या व मध्यम वयाच्या मृत्यूंचे प्रमाण खूप जास्त आहे. (४७% मृत्यू ५५ वर्षांच्या आतच होतात. भारताचे सरासरी आयुर्मान ६५.५ वर्षे आहे.) याचाच अर्थ प्रतिबंधक उपाय आणि आरोग्याच्या सोयी यांच्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.
·       भारतातील एकूण मृत्यूंपैकी १९% मृत्यू हे बालमृत्यू (५ वर्षांच्या आतले) आहेत. हे प्रमाण बिमारू राज्यांमध्ये (बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड) तब्बल २७% पर्यंत जाते. शहरी भागातील प्रमाण (१०%) व ग्रामीण भागातील प्रमाण (२१%) यात खूप मोठा फरक आढळतो.
·       असंसर्गजन्य आजारांचा गट (उदा. हृदयरोग, लकवा, दमा, कॅन्सर इ.) हे भारतातील मृत्यूंचे सर्वात मोठे कारण (४२%) असून त्यांनी संसर्गजन्य रोग (उदा. टीबी, एच.आय.व्ही., मलेरिया, हगवण), माता मृत्यू, मृत अर्भक किंवा जन्मापासून ७ दिवसांच्या आत मृत्यू, कुपोषण या आजारांच्या गटाला (३८% मृत्यू ) मागे टाकले आहे. मात्र बिमारू राज्यांमध्ये उलटी परिस्थिती असून वरील आजारांच्या गटामुळे मृत्यूचे प्रमाण ५०%पर्यंत जाते. तसेच ग्रामीण भागातही हे प्रमाण ४१% पर्यंत जाते.
प्रगत राज्ये/शहरी भाग आणि बिमारू राज्ये/ग्रामीण भाग यांच्या आरोग्याच्या गरजांमध्ये सरळसोट वेगळेपण दिसून येते.
·       हृदयरोग व रक्तवाहिन्यांचे रोग यामुळे भारतात एकूण मृत्यूंपैकी तब्बल १९% मृत्यू होतात. हा बदलत्या जीवनशैलीचा तर परिणाम नसेल?
·       AIDS चे प्रमाण जास्त असलेल्या राज्यांत (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मिझोरम, मणिपूर, नागालँड) १५-५९ या वयोगटांतील मृत्यूचे प्रमाण (३.७%) हे अन्य राज्यांतील प्रमाणापेक्षा (०.४%) खूप जास्त आहे.
·       १५-२४ वयोगटात आत्महत्या हे मृत्यूंचे सर्वात मोठे कारण आहे (१६%). पौगंडावस्थेत आणि तारुण्याच्या सुरुवातीच्या वर्षांत निराशा येण्याची कोणती कारणे असतील?
·       एकूण आत्महत्यांपैकी निम्म्या या विषप्राशानामुळे (बहुतेक कीटकनाशके) होतात.
·       मलेरियाच्या एकूण मृत्यूंपैकी ९०% आणि सर्पदंशाच्या एकूण मृत्यूंपैकी ९७% मृत्यू खेड्यांत होतात. दोन्ही बाबतीत रुग्ण अचानक गंभीर होतात व उपचाराची तातडीची गरज निर्माण होते. मात्र मलेरियाच्या एकूण मृत्यूंपैकी केवळ १४% आणि सर्पदंशाच्या एकूण मृत्यूंपैकी केवळ २३% मृत्यू हे कोणत्याही प्रकारच्या आरोग्यसुविधांमध्ये होतात. याचाच अर्थ खेड्यातील लोक डॉक्टरकडून उपचार न घेता खेड्यातील भोंदूकडे जात असावेत किंवा डॉक्टर/दवाखाना या सोयी त्यांच्यासाठी सहज उपलब्ध नसाव्यात.
·       पावसाळ्यात मलेरिया व सर्पदंशाच्या मृत्यूचे प्रमाण अचानक खूप वाढते.
·       भारतात वाहनांच्या अपघातामुळे दरवर्षी ६ लाख मृत्यू होतात, पोलिसांकडे त्यापैकी केवळ ३ लाख नोंदी असतात.
·       कॅन्सरमुळे होणाऱ्या पुरुषांच्या एकूण मृत्यूंपैकी ४२% तंबाखूजन्य कॅन्सरमुळे होतात, तर स्त्रियांच्या एकूण मृत्यूंपैकी १८% तंबाखूजन्य कॅन्सरमुळे होतात. कॅन्सरचे मृत्यू कमी करण्याचा मार्ग तंबाखूमुक्तीतून सुरू होतो आणि त्यासाठी आपण oncologist असण्याची गरज नाही. सामान्यातला सामान्य माणूस तंबाखूमुक्तीचे काम हाती घेऊ शकतो.

या अहवालातल्या सगळ्या गोष्टी कळल्या असं म्हणायचं धाडस मी करणार नाही. शेवटी आकडेवारी हेच सत्य असते, पूर्वाग्रहाचा चष्मा लावून काढलेले निष्कर्ष हे पूर्ण सत्य कधीच नसते. ती बहुतेक त्या व्यक्तीची मते असतात. भारतातल्या मृत्यूंच्या कारणांची आकडेवारी तुम्ही स्वतः पाहून तुम्हाला सत्याची कोणती बाजू उमजते हे तुम्ही सगळ्यांसमोर मांडू शकता. डॉक्टर मित्रमैत्रिणींसाठी ही एक ज्ञानाची खाण आहे. जेवढे तीतून काढू तेवढे कमीच आहे. कशावर, का, कुठे, कोणासोबत काम करावे हे सांगणारे ते गाईड आहे. अवैद्यकीय मित्रांनी नाराज व्हायचे काहीच कारण नाही. या अहवालातून पुढे आलेली कामे करण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे आपण डॉक्टरच असले पाहिजे असे काही नाही. त्याशिवाय आपल्याला verbal autopsy चे शक्तीशाली साधन तर मिळाले ! कशी सुरुवात करू म्हणून रडत बसायचे कारण नाही. एखादा प्रश्न घेऊन त्याची verbal autopsyने कारणे शोधायला आजच सुरुवात करू शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या? रस्त्यावर वाहनांचे अपघात का झाले? सर्प/विंचूदंश कशामुळे झाले? एखादी सरकारी योजना अपयशी ठरायचे कारण काय होते? रोजगार हमीद्वारे काम मिळण्यामध्ये अडचणी कोणत्या आल्या? महिलांवर अत्याचार होण्याची कारणे कोणती होती? एखाद्या सरकारी कार्यालयात कुठे, किती भ्रष्टाचार झाला? आपल्या गावापासूनच आजच सुरूवात करू शकतो. करायची का?
(हा अहवाल इथे वाचा: http://www.cghr.org/wordpress/wp-content/uploads/Causes_of_death_2001-03.pdf  
 याबद्दल अधिक शोधसाहित्य इथे वाचा: http://www.cghr.org/index.php/publications/million-death-study/)

निखिल जोशी, josnikhil@gmail.com

No comments:

Post a Comment