'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 4 April 2013

मरून पडलेला पांडुरंग- दासू वैद्य

वक्तशीर मुलगा

पाठीवर दप्तर घेऊन

शाळेत वेळेवर पोचतो

तसा येऊन पोचला पाऊस ,

एखादं आदिम तत्त्वज्ञान रुजवावं

तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं

जमिनीच्या पोटात ,

मग भुरभुर वारा सुटला...

छोट्या स्टेशनवर न थांबता

एक्स्प्रेस गाडी

धाड धाड निघून गेल्याप्रमाणे

काळे ढग नुस्तेच तरंगत गेले ,

वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा

अचानक पाऊस बेपत्ता झाला , 


बियांच्या पोपटी अंकुरानं

जमिनीला धडका मारून

वर येण्यासाठी रचलेले मनसुभे

दिवसागणिक वाळून गेले ,

जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप

दवाखान्यातल्या व्हरांड्यात

विमनस्क फेऱ्या मारतो

तसा शेतकरी धुऱ्यावर उभा ,

लांबवर टाळ-मृदंगाच्या गजरात

पंढरपुराकडे निघालेली दिंडी

आणि इथं काळ्या शेतात

मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

No comments:

Post a Comment