'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 13 February 2013

वटवृक्ष वाढतो आहे: निर्माण-५ चे पहिले शिबीर संपन्न



निर्माण-५ शिबीरमालिकेतील युवांचे पहिले शिबीर २९ डिसेंबर ते ६ जानेवारीदरम्यान यशस्वीरित्या पार पडले. प्रायोगिक तत्वावर या वेळी शिबीरे दोन गटांमध्ये घेण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या गटाच्या या पहिल्या शिबिरात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून ५९ अवैद्यकीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
‘तारुण्यभान ते समाजभान आणि समाजभान ते सृष्टीभान’ या सूत्राला मध्यवर्ती ठेवून शिबीर झाले. शिबिरात डॉ. राणी बंग (अम्मा), ज्ञानेश्वरभाऊ व राजेंद्रभाऊ यांनी शारीरिक, मानसिक व सामाजिक पातळीवरील तारुण्यभान हा विषय घेतला. व्यंकटेश अय्यर व अतुल गायकवाड यांनी ‘स्व’ची मानसिक व वैचारिक पातळीवर ओळख होण्यासाठी काही स्वाध्याय घेतले.
 डॉ. अभय बंग (नायना) यांनी सध्या जगभर होत असणारे विविध उठाव व त्याद्वारे होणारे सत्ता किंवा सामजिक परिवर्तन याबद्दल मांडणी केली. दिल्लीमध्ये बलात्काराच्या निषेधात तरुण-तरुणी रस्त्यावर आल्या, देशभरात मेणबत्ती घेऊन अनेकजण रस्त्यावर उतरले; याने नेमक परिवर्तन होते का? काय होते? यावर स्वाध्यायाच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात आले. समाजाची ओळख होण्यासाठी व स्व-विकासासाठी वाचन हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून  श्री. नंदा खरे यांनी वाचन काय करावे? का करावे? या विषयाला धरुन सत्र घेतले. त्यात त्यांनी अनेक पुस्तकांची सारांश माहिती व वाचन सुरू करण्यासाठी  पुस्तकांची यादीदेखील दिली आहे.
निर्माणच्या शिबीरांतून समाजाप्रती जबाबदारी व त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. पण ‘हे कसे करणार?’ याला एक प्रमाणित तयार उत्तर नसते. या शोधास सगुण रुप देण्यासाठी काही जणांनी आपला प्रवास कथन केला. त्यामध्ये नायनांचे ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ हे सत्र होते. त्याच बरोबर शरद अष्टेकर, गौरी चौधरी व सुजय काकरमठ यांनी देखील आपला प्रवास सर्वांसमोर मांडला.
निर्माणचे शिबीर शोधग्राम मध्ये होतात. सर्चच्या कामाबद्दल तुषारभाऊंनी सत्र घेतले. याद्वारे एखादी सामजिक संस्था सेवा, संशोधन व संघर्ष हे सूत्र हाती घेऊन कसे कार्य करू शकते याची ओळख सर्वांना झाली.
शिबिरात पर्यावरणाच्या प्रश्नावर विशेष विचार झाला. An Inconvenient Truth Story of Stuff या फिल्म्स व वेंकीची ‘जाहिरातींना बळी पडून अनावश्यक वस्तूंचा वापर’ या विषयावर मांडणी याआधारे पर्यावरणाला पूरक असे अनेक संकल्प शिबिरार्थ्यांनी आपल्या नियोजनात केले. चर्चेच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्यक्ष काय करु शकतो- याचे सर्वांनी व्यक्तिगत, गट व सामजिक पातळीवर नियोजन सादरीकरण केले. ‘हम होंगे कामयाब’ गुणगुणत या शिबिराची समाप्ती व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. 

No comments:

Post a Comment