'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 4 December 2012

कर के देखना है?


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
२ वर्षांपूर्वी २०१० च्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आगळ्यावेगळ्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुमारे ५००० ग्रामीण स्त्रिया व पुरुष, आपली रोजी चुकवून आलेले, चिमूर ते नागपूर मधील तब्बल १३५ किमी अंतर कापून, चालत चालत. कपडे मळलेले, ऐन थंडीत घामाच्या धारा, मात्र उत्साहात कुठेच कमी नाही. त्यांच्या तार सप्तकातल्या घोषणांनी उभे नागपूर दणाणून गेले. श्रमिक एल्गार व गुरुदेव सेवा मंडळाने श्रीमती पारोमिता गोस्वामींच्या नेतृत्वाखाली काढलेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीची मागणी करणारा हा मोर्चा. दारूच्या झळा सोसलेल्या सामान्य महिलांना तोंड देताना सर्वच नेतृत्वाची तारांबळ उडाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना पारोमिता ताई, डॉ. राणी बंग (अम्मा) व सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्यावाचून पर्याय उरला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना २ महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तज्ञांची समितीही नेमली. समितीने फेब्रुवारी २०१२ मध्ये आपला अहवालही सादर केला. मात्र अजूनही दारूबंदीबाबत कोणताही निर्णय नाही.
पण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी का? साधी सोपी आकडेवारी पाहू. मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात साधारणपणे तब्बल ४०० कोटी रुपयांची दारू विकली गेली. चंद्रपूरची लोकसंख्या २० लाख, म्हणजेच साधारणपणे ४ लाख कुटुंबे. याचा अर्थ दारूमागे प्रत्येक कुटुंबाचे दर वर्षी १० हजार रुपये खर्च होतात! मग चंद्रपुरात दारूचा पूर आलाय असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
आपल्याला काय फरक पडतो? येऊ दे की चंद्रपुरात पूर...
चंद्रपूरच्या पूर्वेला गडचिरोलीत दारूबंदी आहे, छत्तीसगढमध्ये दारूबंदीची प्रक्रिया सुरू आहे. दक्षिणेला आंध्रात अंशतः दारूबंदी आहे (देशी दारूवर बंदी). पश्चिमेला वर्ध्यात दारूबंदी आहे तर यवतमाळमध्ये दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. म्हणजे चंद्रपूरच्या भोवती दारूबंदीची भिंत! मात्र या दारूबंद प्रदेशात चंद्रपुरातून बेकायदेशीर दारूची विक्री होते. इथल्या वैनगंगेला गंमतीने ‘वाईन’गंगा म्हटले जाते. एकेक सुटा दारूबंद जिल्हा असला की अवैध दारूची वाहतूक रोखणे कठीण, मात्र एक लांब दारूबंद झोन असला तर ही वाहतूक रोखणे तुलनेने सोपे होऊन जाते. मग करूयात का चंद्रपूर दारूबंदीची मागणी?
काय म्हणता? तुम्ही चंद्रपूरचे नाही, वर्धा, गडचिरोली, छत्तीसगढ, आंध्राचेही नाही?
उभ्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी ३० हज्ज्जार कोटी रुपयांची दारू खपली. म्हणजे जवळजवळ दीड तेलगी स्टँप घोटाळा किंवा अर्धा सिंचन घोटाळा एका वर्षात, एकट्या महाराष्ट्रात! बरं दारू म्हणजे काही दूध नव्हे. Cancer, liver cirrhosis या शारीरिक आजारांसोबतच नैराश्य, वेडेपणा इ. मानसिक आजार, त्यातून घडणाऱ्या आत्महत्या, अपघात, घराबाहेरचे व घरात घडणारे गंभीर गुन्हे, ही सर्व दारूचीच पिलावळ. २०% शेतकऱ्यांच्या आत्महत्या दारूमुळे (इति मा. नारायण राणे) व ५०% अपघात दारूच्याच नशेत! मग हा चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या नवऱ्याकडून मार खाणाऱ्या एका महिलेचा प्रश्न का आपणा सर्वांचा प्रश्न?
मग लढूयात का दारूविरुद्ध? पण कसे?
  • १२-१२-२०१२ रोजी हिवाळी अधिवेशनात पारोमिता ताईंच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणारा मोर्चा पुन्हा निघणार आहे. येणार का नागपुरात? आम्ही जात आहोत.
  •  दारूप्रश्न, दारूचे दुष्परिणाम, दारूमागचे अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, राजकारण समजून घ्यायचे का? नायनांचे दारूसंबंधी ४ लेख आपण येथे वाचू शकतो: 
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Vishai_Aadhunik_Paschyaatya_Chintan.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Mukti_Dhoran.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf
  • आपल्या जिल्ह्यात दारूचा प्रश्न किती मोठा आहे? RTI टाकून जाणून घ्यायचं का?
  •  सह्यांची मोहीम हाती घ्यायची का? चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणाऱ्या १० हजार जणांची नावे व सह्या मुख्यमंत्र्यांना पाठवायच्या का? (१० हजार लोकांच्या १० हजार प्रश्नांना उत्तरे देताना आपलीही समज वाढत जाईल.)
  • चंद्रपूर दारूबंदीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री व शरद पवारांना पाठवायचे का?
  • महाराष्ट्रात ज्या ठिकाणी निर्माणींचा गट असेल तेथे प्रत्येकी १ चर्चासत्र घ्यायचे का?
  • अजून काय करता येईल? तुम्ही सुचवा ना...

No comments:

Post a Comment