'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 4 December 2012

कर के देखना है?


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
२ वर्षांपूर्वी २०१० च्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आगळ्यावेगळ्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुमारे ५००० ग्रामीण स्त्रिया व पुरुष, आपली रोजी चुकवून आलेले, चिमूर ते नागपूर मधील तब्बल १३५ किमी अंतर कापून, चालत चालत. कपडे मळलेले, ऐन थंडीत घामाच्या धारा, मात्र उत्साहात कुठेच कमी नाही. त्यांच्या तार सप्तकातल्या घोषणांनी उभे नागपूर दणाणून गेले. श्रमिक एल्गार व गुरुदेव सेवा मंडळाने श्रीमती पारोमिता गोस्वामींच्या नेतृत्वाखाली काढलेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीची मागणी करणारा हा मोर्चा. दारूच्या झळा सोसलेल्या सामान्य महिलांना तोंड देताना सर्वच नेतृत्वाची तारांबळ उडाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना पारोमिता ताई, डॉ. राणी बंग (अम्मा) व सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्यावाचून पर्याय उरला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना २ महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तज्ञांची समितीही नेमली. समितीने फेब्रुवारी २०१२ मध्ये आपला अहवालही सादर केला. मात्र अजूनही दारूबंदीबाबत कोणताही निर्णय नाही.
पण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी का? साधी सोपी आकडेवारी पाहू. मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात साधारणपणे तब्बल ४०० कोटी रुपयांची दारू विकली गेली. चंद्रपूरची लोकसंख्या २० लाख, म्हणजेच साधारणपणे ४ लाख कुटुंबे. याचा अर्थ दारूमागे प्रत्येक कुटुंबाचे दर वर्षी १० हजार रुपये खर्च होतात! मग चंद्रपुरात दारूचा पूर आलाय असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
आपल्याला काय फरक पडतो? येऊ दे की चंद्रपुरात पूर...
चंद्रपूरच्या पूर्वेला गडचिरोलीत दारूबंदी आहे, छत्तीसगढमध्ये दारूबंदीची प्रक्रिया सुरू आहे. दक्षिणेला आंध्रात अंशतः दारूबंदी आहे (देशी दारूवर बंदी). पश्चिमेला वर्ध्यात दारूबंदी आहे तर यवतमाळमध्ये दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. म्हणजे चंद्रपूरच्या भोवती दारूबंदीची भिंत! मात्र या दारूबंद प्रदेशात चंद्रपुरातून बेकायदेशीर दारूची विक्री होते. इथल्या वैनगंगेला गंमतीने ‘वाईन’गंगा म्हटले जाते. एकेक सुटा दारूबंद जिल्हा असला की अवैध दारूची वाहतूक रोखणे कठीण, मात्र एक लांब दारूबंद झोन असला तर ही वाहतूक रोखणे तुलनेने सोपे होऊन जाते. मग करूयात का चंद्रपूर दारूबंदीची मागणी?
काय म्हणता? तुम्ही चंद्रपूरचे नाही, वर्धा, गडचिरोली, छत्तीसगढ, आंध्राचेही नाही?
उभ्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी ३० हज्ज्जार कोटी रुपयांची दारू खपली. म्हणजे जवळजवळ दीड तेलगी स्टँप घोटाळा किंवा अर्धा सिंचन घोटाळा एका वर्षात, एकट्या महाराष्ट्रात! बरं दारू म्हणजे काही दूध नव्हे. Cancer, liver cirrhosis या शारीरिक आजारांसोबतच नैराश्य, वेडेपणा इ. मानसिक आजार, त्यातून घडणाऱ्या आत्महत्या, अपघात, घराबाहेरचे व घरात घडणारे गंभीर गुन्हे, ही सर्व दारूचीच पिलावळ. २०% शेतकऱ्यांच्या आत्महत्या दारूमुळे (इति मा. नारायण राणे) व ५०% अपघात दारूच्याच नशेत! मग हा चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या नवऱ्याकडून मार खाणाऱ्या एका महिलेचा प्रश्न का आपणा सर्वांचा प्रश्न?
मग लढूयात का दारूविरुद्ध? पण कसे?
  • १२-१२-२०१२ रोजी हिवाळी अधिवेशनात पारोमिता ताईंच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणारा मोर्चा पुन्हा निघणार आहे. येणार का नागपुरात? आम्ही जात आहोत.
  •  दारूप्रश्न, दारूचे दुष्परिणाम, दारूमागचे अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, राजकारण समजून घ्यायचे का? नायनांचे दारूसंबंधी ४ लेख आपण येथे वाचू शकतो: 
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Vishai_Aadhunik_Paschyaatya_Chintan.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Mukti_Dhoran.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf
  • आपल्या जिल्ह्यात दारूचा प्रश्न किती मोठा आहे? RTI टाकून जाणून घ्यायचं का?
  •  सह्यांची मोहीम हाती घ्यायची का? चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणाऱ्या १० हजार जणांची नावे व सह्या मुख्यमंत्र्यांना पाठवायच्या का? (१० हजार लोकांच्या १० हजार प्रश्नांना उत्तरे देताना आपलीही समज वाढत जाईल.)
  • चंद्रपूर दारूबंदीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री व शरद पवारांना पाठवायचे का?
  • महाराष्ट्रात ज्या ठिकाणी निर्माणींचा गट असेल तेथे प्रत्येकी १ चर्चासत्र घ्यायचे का?
  • अजून काय करता येईल? तुम्ही सुचवा ना...

चारुता गोखलेचे Indian council of medical research द्वारा आयोजित कॉन्फरन्समध्ये ‘मलेरिया’वरील संशोधनाचे सादरीकरण


निर्माण १ च्या चारुताने मदुराई येथे Indian council of medical research द्वारा आयोजित कॉन्फरन्समध्ये ‘मलेरिया’ या विषयावर सादरीकरण केले. Medical arthopodology (आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍य़ा कीटकांचे शास्त्र) असा या कॉन्फरन्सचा विषय होता.
चारुता गेली दीड वर्षे सर्च संस्थेबरोबर मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत काम करत आहे. राधिका सुंदराराजन या हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉक्टरसोबत सर्चने नुकतेच एक संशोधन पूर्ण केले. या संशोधनाअंतर्गत आदिवासी लोकांच्या मलेरियासंबंधीच्या समजुती, मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय तसेच सरकारी अधिकार्‍यांच्या दृष्टीने राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमातील त्रुटी, त्यातील संभाव्य सुधारणा याचा खोलवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून पुढे आलेले निष्क़र्ष चारुताने या दोन दिवसीय कॉंन्फरन्सदरम्यान तज्ञांपुढे मांडले. उपस्थितांमध्ये देशभरातील कीटकशास्त्रज्ञ, सामाजिक आरोग्य क्षेत्रातील शास्त्रज्ञ तसेच सरकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पीएचडी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कॉंन्फरन्समध्ये प्रामुख्याने रोग ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जे जंतुंचे वाहक असतात अशा  मलेरिया, फायलेरिया, डेंगी याविषयी लोकांनी सादरीकरण केले. यातील काही अभ्यास हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित होते तर काही अभ्यासामधून बाहेर आलेली निरीक्षणं ही राष्ट्रीय कार्यक्रमांमधील सुधारणांच्या द्ष्टीने महत्त्वाची होती.
चारुताला कॉंन्फरन्सदरम्यान या अभ्यासासंबंधी अनेक सुझाव मिळाले. या अभ्यासाचे पुढे होणारे परिणाम, अभ्यास अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुधारणा, शोधनिबंध लिहिताना घ्यायची काळजी या मुद्यासंबंधी अनेक तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. सर्चच्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमालाही या अभ्यासाचा फायदा होईल अशी आशा आहे

अशीही एक दिवाळी


रामानंद जाधवची जाराबंडी वैद्यकीय पथकात आगळीवेगळी दिवाळी
गडचिरोली जिल्ह्यातील जाराबंडी प्राथमिक आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळणारा रामानंद जाधव दिवाळीला घरी जात असताना त्याला जाराबंडीच्या ग्रामसेवकाचा फोन आला. जाराबंडीजवळ झालेल्या पोलीस व नक्षलवाद्यांच्यात झालेल्या चकमकीत ३ पोलीस जखमी झाल्याचे वृत्त रामानंदला समजले. आपत्कालीन परिस्थितीत कधीही वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज लागू शकते हे समजून घेऊन जाराबंडीपासून १५० किमी. आलेला रामानंद त्वरित मागे फिरला व आपल्या वैद्यकीय पथकात रुजू झाला. वरवरची जखम असणाऱ्या २ पोलीसांवर आवश्यक ते उपचार केले. त्याच्या आईवडिलांनीही घाबरून न जाता उलट रामानंदला धीर दिला व दिवाळीत स्वतःच जाराबंडीला आले. आपले कर्तव्य बजावल्याचे, गरज असताना आईवडिलांचा आधार मिळाल्याचे व दिवाळीत वैद्यकीय पथकात राहिल्यामुळे मलेरियाच्या एका गंभीर रुग्णाला बरे करू शकल्याचे रामानंदला नक्कीच समाधान वाटत असेल.

तिनका तिनका जर्रा जर्रा


आपल्या सर्वांचे लाडके गुरू (व त्याहीपेक्षा अधिक मित्र) श्री नंदा खरे (नंदा काका) ‘तिनका तिनका जर्रा जर्रा’ या स्तंभातून त्यांच्या वाचनातले सुंदर उतारे व त्यावर त्यांची टिप्पणी घेऊन येतील. त्यांनी आपल्याला दिलेल्या गवताच्या काड्यांचे सुंदर घरटे बनवणे ही आपली जबाबदारी आहे. 

स्टुअर्ट कॉफमन (Stuart Kauffman) हा कोलाहलशास्त्री (Chaos Theorist) आहे.
सुरुवातीला लहानसे असणारे फरक शेवटी फारच वेगवेगळे परिणाम घडवतात, हा कोलाहलशास्त्राचा एक महत्वाचा निष्कर्ष.
मागच्या "सीमोल्लंघन"मधला हा Butterfly Effect.
आज एका जागी फुलपाखरू पंख फडफडवते,
आणि काही वर्षांनी दुसऱ्या जागी वादळ येते!
कॉफमनच्या At Home in the Universe या पुस्तकातला हा उतारा, मुळातूनच घ्या--
In such a poised world, we must give up the pretense
of Long-Term prediction.
We cannot know the true consequences
of our own best actions.
All we players can do is be locally wise,
not globally wise.
All we can do, all anyone can do, is
    to hitch up our pants,
    put on our galoshes, and
    get on with it
    the best we can.
(galoshes म्हणजे आपण ज्यांना मराठीत (!) गम-बूट म्हणतो ते!)
तर काय, कॉफमन सांगतो की वाट चिखलाची, काट्याकुट्यांची असेल.
"मंझिल" स्पष्ट नसेल, पण
"करके देखो"!
               नंदा