'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 19 November 2012

दोन निर्माणी डॉक्टरांनी घडवला प्राथमिक आरोग्य केंद्रांचा जीर्णोद्धार

डॉ. रामानंद जाधव
उण्यापुऱ्या ७ महिन्यांत मिळाली लोकांची पावती



गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे निर्माणचे डॉ. शिवप्रसाद थोरवे (प्राथमिक आरोग्य केंद्र, पेंढरी) व डॉ. रामानंद जाधव (प्राथमिक आरोग्य पथक, जाराबंडी) यांच्या कामाला रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. शिवप्रसाद थोरवे
आलेला रुग्ण परत जावू नये म्हणून डॉ.  शिवप्रसाद याने रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध असण्यावर व औषधांचा साठा अद्ययावत ठेवण्यावर भर दिला. तसेच त्याने उपलब्ध सोयीसुविधांमध्ये सतत सुधारणा करण्याचा धडाका लावला. Operation theatre दुरुस्त करणे, आरोग्य केंद्रात विजेचा अखंडित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी inverter बसवणे येथपासून बंद पडलेली उपकेंद्रे सुरू करणे, उपकेंद्रांवर नर्स उपलब्ध राहतील याची काळजी घेणे, सुरक्षित बाळंतपणासाठी त्यांना साधनसामुग्री पुरवणे, आशांच्या मानधनाचा अनुशेष भरून काढणे अशी प्रशासकीय कामेही त्याने सांभाळली. त्याचा परिणाम होऊन एप्रिल महिन्यात दवाखान्यात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्येमध्ये ३५५ वरून वाढ होऊन ऑक्टोबर महिन्यात ती १२४५ वर पोहोचली आहे.

डॉ. रामानंदच्या प्रयत्नांमुळे पूर्वी अनियमितपणे चालणारा बाह्य रुग्ण विभाग रोज नियमितपणे सुरू झाला आहे. दवाखान्याच्या ठरलेल्या वेळेत रुग्णांनी येण्याची अपेक्षा न ठेवता रुग्ण येतील तीच दवाखान्याची वेळ असा मूलगामी बदल त्याने घडवून आणला आहे. रुग्णांना दवाखान्यात यावेसे वाटावे म्हणून दवाखान्याची स्वच्छता, औषधे तसेच इंजेक्शनचा साठा अद्ययावत ठेवण्याकडे त्याने विशेष लक्ष दिले आहे. वेळप्रसंगी चालक नसताना स्वतः गाडी चालवून गडचिरोलीतून औषधे आणली आहेत. त्याच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून दवाखान्यात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात १७८ वरून ऑक्टोबर महिन्यात १०१६ पर्यंत वाढली आहे.

कठीण परिस्थितीतही स्वतःच्या अडचणींऐवजी रुग्णाला केंद्रस्थानी ठेवले तर मोठा परिणाम होतो याचे हे तरुण डॉक्टर्स उत्तम उदाहरण आहेत.

No comments:

Post a Comment