'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 19 November 2012

वाई येथे निर्माण समुदाय चिंतन बैठक संपन्न

महाराष्ट्रातील युवांमधून सामाजिक कृती व परिवर्तनासाठी नवे कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी सुरु झालेल्या ‘निर्माण’ या उपक्रमाबाबत व या एकूणच कल्पनेबाबत ज्यांना आस्था आहे, जे निर्माणला विविध पद्धतींनी मदत व मार्गदर्शन करतात, जे निर्माणचे हितचिंतक आहेत अशा महाराष्ट्रभरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा व विचारवंतांचा गट म्हणजे निर्माण समुदाय! संख्येने व वैविध्यात सतत वाढत असलेला हा गट दर वर्षा-दोन वर्षात एकत्र जमतो व निर्माणच्या वाटचालीचा आढावा घेतो, विविध मुद्द्यांवर चर्चा करतो व भविष्याच्या दृष्टीने विचारमंथन करतो. या गटाची दोन दिवसीय चिंतन बैठक 16 व 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या पुढाकाराने वाई येथे आयोजित करण्यात आली होती. “२१व्या शतकातील महाराष्ट्रासाठी सामाजिक परिवर्तनाच्या युवा कार्यकर्त्यांचे निर्माण” ही या बैठकीची मुख्य थीम होती. महाराष्ट्राच्या विविध भागात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक व वैज्ञानिक क्षेत्रांत कार्यरत असलेले सुमारे 30 मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

२१व्या शतकाच्या पहिल्या अर्धशकांत महाराष्ट्राचे चित्र काय राहील, प्रमुख सामाजिक आव्हाने कोणती असतील, यासाठी आवश्यक परिवर्तनाचा कार्यकर्ता कसा असेल, त्याच्या आर्थिक आधाराचे स्वरूप/ मार्ग काय असू शकेल, महाराष्ट्रातील युवांना समाजोन्मुख होवून व पुढे परिवर्तनाचा कार्यकर्ता म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक विचार, मूल्य, निष्ठा व क्षमता कशा मिळतील, त्यासाठी शिक्षण व विकास प्रक्रिया काय असू शकेल, इ. विविध विषयांवर या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. सुरुवातीला निर्माण प्रक्रियेची आजवरची वाटचाल, उपलब्धी, प्रश्न व या प्रक्रियेद्वारे महाराष्ट्रातील युवांचे कळलेले चित्र यावर निर्माण कोऑर्डिनेशन टीमद्वारे थोडक्यात मांडणी झाली. बैठकीच्या अंती निर्माण समुदाय म्हणून मी काय करू इच्छितो/इच्छिते यावरही चर्चा झाली.

सर्व उपस्थित मान्यवर हे गेली कित्येक वर्षे आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत संवेदनशीलपणे व सामाजिक जाणीवेतून सातत्याने महत्वपूर्ण योगदान देत असल्याने त्यांच्या अनुभवाचा व चिंतनाचा उपयोग ही बैठक अर्थगर्भ होण्यासाठी तर झालाच पण सोबतच निर्माण व निर्माण समुदायाच्या पुढील प्रवासामध्येही उपयुक्त असेल.

No comments:

Post a Comment