'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 19 November 2012

पुस्तक परीक्षण: मंगल प्रभात (महात्मा गांधी)


दोनशे वर्षांनतर लोक गांधीजींना ओळखतील ते या पुस्तकामुळे –  विनोबा भावे

१९३० साली गांधीजी ‘येरवडा मंदिरात’ तुरुंगवास भोगत होते. तेव्हा २२ जुलै ते १४ ऑक्टोबर या दरम्यान त्यांनी आपल्या आश्रमवासी सहकाऱ्यांना १३ पत्रे लिहिली. मंगल प्रभात हे तळहाताहून थोड्या मोठ्या आकारांच्या साठ पानांचे पुस्तक या पत्रांचा संग्रह आहे. दर मंगळवारी सकाळची प्रार्थना आटोपली की गांधीजी हि पत्रे लिहायला बसायचे. त्यामुळे या संग्रहाला “मंगल-प्रभात” असे नाव दिले गेले. भारतीय समाजावर जेव्हा नैराश्येचे घोर साम्राज्य पसरले होते तेव्हा ज्या व्रतांनी राष्ट्रीय जीवनामध्ये आशा पल्लवित केल्या, स्वतःवरती विश्वास निर्माण केला, स्फूर्ती आणि धार्मिकतेचे वारे वाहते केले त्या व्रतांविषयीची गांधीजीची ही प्रवचने आहेत, असा खुलासा दत्तात्रेय कालेलकरांनी या पुस्तकास लिहिलेल्या प्रस्तावनेत केला आहे.
सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अस्वाद, अस्तेय (चोरी न करणे), अपरिग्रह (अतिरिक्त साठा न करणे), अभय, अस्पृश्यता निवारण, अंगमेहनत, सर्वधर्म समभाव, नम्रता आणि  स्वदेशी या व्रतांचा अर्थ, त्यांचा परस्पर संबंध आणि आपल्या आयुष्यातील त्यांचे महत्व गांधीजी आपल्या प्रवचानांमधून स्पष्ट करतात. तुरुंगामध्ये असताना ‘स्वदेशी’विषयी भाष्य करणार नाही असे वचन गांधीजींनी इंग्रज सरकारला दिले होते. त्यामुळे मूळ तेरा पत्रांमध्ये ‘स्वदेशी’ या व्रताचा समावेश नव्हता. तो पुढे केव्हातरी केला.
व्रत म्हणजे अटळ निश्चयाने नियमितपणे करावयाचा आचार आणि विचार. एखादी कृती नियम म्हणून करणं आणि तीच कृती व्रत समजून करणं यात अंतर आहे. अडचणीच्या एखाद्या वेळी नियम मोडण्याची मुभा घेतली जावू शकते. व्रतस्थ माणसाला हे स्वातंत्र्य नसते. अडचणींच्या वेळी निश्चयापासून न हटता उलट त्याचे पालन करणे म्हणजेच त्या निश्चयाप्रती व्रतस्थ असणे. अशी व्रते घेतल्याशिवाय माणसाची प्रगती होणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या सारासार विवेक बुद्धीला जे पटत पण जे आपण सवयीने आचरणात आणू शकत नाही असे काम करण्याचेच आपण व्रत घेतले पाहिजे. प्रसंगी जीवाची बाजी लावून निर्धाराने त्याचे पालन केले पाहिजे. ‘जमेल तेवढे, झेपेल तसे नक्की करेन’ म्हणणारे पहिल्याच अडचणींचा सामना करताना हार पत्करतात. उलट कठीण प्रसंगीही आपल्या व्रताचे पालन केल्याने आपण नैतिकतेच्या कसोटीवर खरे उतरतोच शिवाय इतरांवरही त्याचा विलक्षण सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे काही व्रते आपल्या जीवनाचा आधार असली पाहिजेत असे गांधीजी आपल्या शेवटच्या पत्रात सांगतात. कोणती व्रते आपल्या जीवनाचा आधार असावीत हे ठरवताना गांधीजीनी एका सुंदर कसोटीचा वापर केला आहे. ते म्हणतात संपूर्ण सत्याचा अनुभव हे आपले ध्येय आहे, तर अहिंसा हा त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग. त्यामुळे जी व्रते आपल्याला अहिंसेच्या मार्गाने सत्यापर्यंत घेवून जातील ती व्रते आपण अंगिकारली पाहिजेत.
अर्थात त्यासाठी आधी सत्य आणि अहिंसेचे म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. सत्य म्हणजे केवळ खोटे बोलणे नव्हे. जे जे अस्तित्वात आहे ते सारे सत्य आहे. जे स्थळ आणि काळ व्यापून उरतं ते सत्याचे विश्वरूप. ते कधीही नष्ट होणारे नाही. विश्वाच्या पटलावर आपला देह कणभर आहे आणि काळाच्या आलेखावर आपले आयुष्य अक्षरशः क्षणभर आहे. त्यामुळे सत्याच्या विश्वारुपाचे या देही दर्शन होणे अशक्य आहे. मात्र सत्याचा शोध घेत राहणे हा “चटपटीत” अनुभव असतो, असं गांधीजी पहिल्याच पत्रात लिहितात. सत्य गवसणे म्हणजेच ज्ञान प्राप्त होणे. ज्ञान प्राप्त होण्यातच आनंद सामावलेला आहे. असा आनंद अनुभवणं म्हणजेच त्या सत्-चीत्-आनंद रूपाशी एकरूप होणं. ह्या सत्-चीत्-आनंदाचा शोध घेण्यातच माझ्या जगण्याचे इप्सित दडलेले आहे यावर श्रद्धा ठेवली तर प्रयोगशीलता आणि वैराग्य या दोन साधनांच्या मदतीने तो अनुभव घेता येतो.
आपले विचार-बोलणे आणि वागणे यातील खरेपणा म्हणजे सत्य, असे समजून सुरुवात करावी. आपल्याला सापडेल त्या मार्गाने सत्य शोधण्याचा प्रवास सुरु करावा. हा प्रवास खडतर आहे. ठेचा खात खात योग्य मार्ग शोधात राहणे हि तपश्चर्या आहे. ती करताना स्वार्थ आपोआप गळून पडतो. आणि निःस्वार्थ प्रवास करणारा कुणीही आजवर चुकीच्या मार्गाने शेवटपर्यंत गेलेला नाही. वाट चुकली तर ठेच लागतेच. ठेच लागलेला माणूस त्याच चुकीच्या वाटेने चालणार नाही. तो योग्य वाटेच्या शोधात परत फिरेल. त्यामुळे तो योग्य मार्गानेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल. तेव्हा सत्याच्या शोधात चालत राहिले पाहिजे. साहजिकच हा मार्ग डरपोक लोकांसाठी नाही. मात्र हे खरे कि सत्य परीस-कामधेनु-चिंतामणी-परमेश्वर आहे. 
सत्याच्या शोधात निघालेल्या जिज्ञासुला अहिंसेचा मार्ग सापडतो. सत्याच्या शोधात अनेक अडचणी समोर येतात. त्या झेलू कि त्यांचा सामना करण्याचे टाळण्यासाठी शक्य तो नाश करू ? हा प्रश्न पडतो. नाश करून पुढे जाता येत नाही. अडचणी झेलूनच ते शक्य होते. अडचणी झेलणं हि शूरता, आणि त्यां संपवण्यासाठी विनाश करणे ही कायरता आहे. ‘मी अडचणींचा सामना करू कि त्या संपवण्यासाठी हल्ला करण्याची कायरता दाखवू?’ या प्रश्नात दडलेले सत्य शोधताना अहिंसेची भावना निर्माण होते. तमाम खराब विचार आणि त्याबरहुकूम झालेली प्रत्येक कृती ही हिंसाच आहे. केवळ एखाद्याला शाररीक यातना देणे म्हणजेच अहिंसा नव्हे. या दृष्टीने अहिंसा समजून घेतली आणि पाळली तर आपल्यामते धैर्य, साहस, उदारता, शांती आणि सुख वाढते. हे हवे असते तेव्हाच तर आपल्याला चिंतामणी आणि परमेश्वाराची आठवण होते, नाही का ?
अहिंसा म्हणजे सर्वव्यापी प्रेम. प्रापंचिक जीवनात अडकलेल्या व्यक्तींसाठी कुटुंबाची कल्पना खूप मर्यादित झालेली असते, त्यांनी आपले सर्वस्व आपल्या कुटुंबियांना अर्पण केलेले असते. ते सर्वांप्रती सारखे प्रेम बाळगू शकणार नाहीत. म्हणून  सत्यशोधकाने ब्रम्हचर्य पाळावे. याचा अर्थ जनन इंद्रियांवर काबू असा न घेता सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे असा घेतला पाहिजे. 
चौथे, पाचवे आणि सहावे पत्र अनुक्रमे अस्वाद, अस्तेय आणि अपरिग्रह या व्रतांविषयी आहे. चवीसाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर शरीराची गरज भागविण्यासाठी औषध समजून गरजेपुरतेच अन्न आपण ग्रहण केले पाहिजे. संबंधित व्यक्तीची  परवानगी असल्याशिवाय आणि आपली ती खरच गरज असल्याशिवाय एखाद्याची कोणतीही वस्तू घेणे किंवा त्यावर वाईट नजर ठेवणे, ती वस्तू हस्तगत करण्याचा विचार करणे म्हणजेच चोरी करणे, जगात आज जी काही कंगाली आहे ती माणसाच्या या वृत्तीमुळेच बोकाळलेली आहे तेव्हा आपण सार्वार्थाने चोरी करू नये. कुणी गरजेपेक्षा जास्त साठवले नाही तर जगात विषमता उरणारच नाही त्यामुळे आपण जाणीवपूर्वक आपल्या गरजा कमी कराव्यात, वस्तू आणी ज्ञानाचा सुद्धा अनावश्यक संग्रह करू नये. असा ह्या व्रतांचा ठोबळ अर्थ आहे.
गांधीजी पुढे अभय, अस्पृश्यता निवारण, अंगमेहनत आणि सर्वधर्म समभाव या व्रतांविषयी लिहिताहेत. सर्व बाह्य भीतींपासून आपण मुक्ती मिळवली पाहिजे. भीती ही शरीराशी संबंधित असते. शरीराचा मोह टाळला तर आपण आत्मरूप होतो. आपण सारेच आत्मरूप आहोत. स्पृश्य-अस्पृश्यतेचा भेद हा हिंदू धर्मास लागलेली कीड आहे. ती आपण प्रतत्नपूर्वक काढून टाकली पाहिजे. अस्पृश्यता हि कामाच्या विभागणीपासून सुरु होते त्यामुळे कोणतेही काम वाईट न समजता आपण ते केले पाहिजे. जो कष्ट करीत नाही त्याला खायचा अधिकार काय ? असा तीक्ष्ण प्रश्न गांधीजी विचारतात. पुढची तीन पत्रे सर्वधर्म समभाव, नम्रता आणि स्वदेशी विषयी आहेत.
सर्वच व्रतांची चर्चा करताना गांधीजी मी स्वतः ते समाज, सृष्टी आणि त्याही पलीकडे जे अमूर्त आहे तिथपर्यंत साऱ्याचा पट उलगडतात. त्याचा परस्पर संबंध सांगतात. एक एक व्रत आचरून आपण काय अनुभवू शकतो ते सांगतात. व्रत घ्यायचे म्हणजे लगेच उद्यापासून त्याचे तंतोतंत पालन केल पाहिजे असे नव्हे तर तसे करण्याचा रोज प्रामाणिक प्रयत्न करणे, हे आग्रहाने सांगतात. वाचायला सोपे आणि समजायला कठीण असे हे पुस्तक आपल्याला पडलेल्या कोड्यांची उत्तरे देते. निदान तसे क्षणिक समाधान तरी देते. पुन्हा ते वाचावे अशी ओढ निर्माण करते.
माझे सत्य आणि त्याचे सत्य खरे असू शकते, मग कोणते सत्य मानायचे ? रोज कितीतरी किडे-मुंग्या पायाखाली चेंगरून मारतात, मग अहिंसा पाळणे कसे शक्य होईल ? लग्न केलेल्यांनी ब्रम्हचर्य कसे पाळायचे आणि ते पाळायचे असेल तर इतर सर्वानीच लग्न करायचे नाही, हे कसे चालेल ? मीठ जेवणाला स्वाद देते मग अस्वादी व्हायचे म्हणजे मीठही खायचे नाही का ? असे प्रश्न पडले असतील तर हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.
कल्याण टांकसाळे









No comments:

Post a Comment