सीमोल्लंघन
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Tuesday 30 April 2024
युवांपुढचा सगळ्यात कळीचा प्रश्न?
Thursday 29 February 2024
‘यूथ फ्लरिशिंग’ म्हणजे काय?
अमृत बंग
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.
amrutabang@gmail.com
Wednesday 31 January 2024
युवा कसे जगत आहेत?
लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बर्याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनक देखील कोणाला नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (stunting) प्रमाण हे 35% आहे. मात्र निर्माणद्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (languishing) प्रमाण हे 43% आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करुया.
Sunday 28 January 2024
युवा म्हणजे नेमके कोण?
निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची, त्यांचे प्रश्न – द्वंद्व – निर्णय – त्यांचे परिणाम बघण्याची आणि त्यांच्या विकासात हातभार लावण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्यांना लाभली. बहुतांश वेळा आनंददायी, कधी त्रासदायक पण कायमच शिकवणारा असा हा प्रवास राहिला आहे. या दरम्यानचे आमचे अनुभव व निरीक्षणे, गोळा झालेल्या माहितीचे विश्लेषण आणि सोबतच ‘यूथ सायकॉलॉजी’ या विषयाचे आधुनिक विज्ञान या सगळ्यांचा आधार 'लोकसत्ता' या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या सदरातील मांडणी करताना मी घेणार आहे.
‘भारत हा युवांचा देश आहे’ हे आता वापरुन वापरुन गुळगुळीत झालेले वाक्य आहे. पण ‘युवा / यूथ’ म्हणजे नेमके कोण ही मात्र अगदी सर्वज्ञात व सर्वमान्य अशी संज्ञा नाही. ‘यूथ’ या नावाखाली अनेक विविध वयोगट खपून जातात. युनायटेड नेशन्स असो की भारत सरकार, वय वर्षे 13 पासून ते वर्ष 35 पर्यन्तच्या दरम्यानचे अनेक कालखंड (13 ते 35, 15 ते 34, 15 ते 29, 18 ते 24, 18 ते 29, ...) हे युवावस्थेसाठी म्हणून वापरले जातात. यात दुर्दैवाने अजून सार्वमत नाही. व्याख्येचाच गोंधळ असेल तर भारतात नेमके युवा किती याच्या उत्तरांत देखील तफावत येणारच. काही तरी ठोस नेमकेपणा हवा म्हणून निर्माणमध्ये आम्ही 18 ते 29 या वयोगटाला युवा म्हणून मानायचे असे ठरवले आहे (त्यामागची काही वैज्ञानिक व व्यावहारिक कारणे पुढे येतील). या सदरासाठी देखील आपण तीच व्याख्या कायम ठेऊया.
तर 18 ते 29 या वयोगटात भारताची 22% लोकसंख्या आहे. म्हणजे एकूण 26 कोटी लोक! आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे 26 कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त आहेत. या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडेंड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणे हे अत्यावश्यक आहे, कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा, ताकद आणि भविष्य असणार आहे. 2021 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 28 वर्षे होते, म्हणजेच भारताची अर्धी लोकसंख्या ही 28 वर्षांपेक्षा कमी वयाची आणि उरलेली अर्धी अधिक वयाची होती. तुलनेसाठी म्हणून त्याच सुमारास चीनचे ‘मिडियन’ वय हे 37, पश्चिम युरोपचे 45 व जपानचे 49 वर्षे होते. जगातल्या सर्वाधिक तरुण देशांपैकी एक हा भारत आहे. पण सोबतच हे समजून घेणे देखील गरजेचे आहे की ही अमर्यादित काळासाठी उपलब्ध असलेली संधी नाही. 2031 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 31 वर्षे होणार आहे आणि त्यापुढे ते अधिकाधिक वाढत जाणार आहे. आपण कोणीच आज जितके तरुण आहोत तितके भविष्यात नसणार, हे जसे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत वैयक्तिकरीत्या खरे तसेच ते देशाच्या पातळीवर देखील खरे आहे. म्हणूनच युवांच्या बाबतीतली आपली समज वाढणे आणि त्यांच्या सकारात्मक वाढीला, कर्तृत्वक्षमतेला खतपाणी घालणे ही येत्या दशकातली कळीची बाब असणार आहे. हे नीट करता यावे यासाठी युवावस्था नेमकी काय, ती कशी उदयाला आली / येते, तिची प्रमुख लक्षणे (फीचर्स) काय, त्यादरम्यानच्या प्रमुख समस्या काय, इ. बाबतीत आपले समाज म्हणून आकलन विस्तारणे आवश्यक आहे.
अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठातील रिसर्च प्रोफेसर जेफ्री आर्नेट यांनी 2000 साली ‘अमेरिकन सायकॉलॉजिस्ट’ या प्रख्यात शोधपत्रिकेत लिहिलेल्या निबंधात या मधल्या अवस्थेचे विस्तृत वर्णन करून तिला ‘इमर्जिंग ऍडल्टहूड’ असे नाव दिले आहे. एरिक्सन यांच्या ‘लाईफस्पॅन थियरी’ मधील पौंगडावस्था ते प्रौढावस्था यांच्या दरम्यानची अशी ही नवीन पायरी आता मानली जात आहे. आर्नेट यांचा हा शोधनिबंध एक मैलाचा दगड ठरला असून त्यानंतर आता इमर्जिंग ऍडल्टहूड हा एक गंभीर अभ्यासाचा विषय बनला आहे. या विषयाला पूर्णत: वाहून घेतलेले आणि दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे इमर्जिंग ऍडल्टहूड याच नावाचे एक जर्नल देखील आहे ज्यामध्ये जगभरातून येणारे शोधनिबंध असतात. दुर्दैवाने जगातील सर्वात जास्त इमर्जिंग ऍडल्ट्स (म्हणजेच 18 ते 29 वयोगटातील आपले युवा अथवा यूथ) ज्या भारत देशात आहेत तिथून मात्र फारच कमी (जवळजवळ नाहीतच) असे या विषयावरचे शोधनिबंध प्रकाशित होतात. भारतासाठीच्या महत्त्वाच्या अशा आरोग्याच्या अनेक प्रश्नांवर (उदा. मलेरिया, टीबी) जसे भारतीयांनी नाही तर पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी संशोधन केले, तसे काहीसे याबाबतीत व्हायचे नसेल तर आपल्या देशातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे, सामाजिक संस्था, इत्यादींनी आपल्याकडील या 26 कोटी इमर्जिंग ऍडल्ट्स / यूथ / युवांबाबत संशोधन करणे, त्यांना समजून घेणे व त्यांच्या सुयोग्य वाढीसाठी विविध उपक्रम विकसित करणे हे अत्यावश्यक आहे.
जन्मल्यापासून पुढे
मनुष्याची वाढ टप्प्याटप्प्याने कशी होते याबाबत मानसशास्त्रामध्ये एरिक एरिक्सन
यांची ‘लाईफस्पॅन थियरी’ महत्त्वाची मानली जाते. बालपण ते प्रौढावस्था यांच्या
मध्ये पौंगडावस्था (ऍडॉलेसन्स) ही एक पायरी यात मानली गेली आहे. जी. स्टॅन्ली हॉल
हे अॅडोलेसन्सच्या वैज्ञानिक अभ्यासाचे जनक मानले जातात. त्यांनी 1904 साली
या विषयावर पहिल्यांदा दोन खंडांचे पुस्तक लिहिले. त्यांतर हळुहळु ऍडॉलेसन्स हा
घरोघरी वापरला जाणारा शब्द झाला. (हॉल यांच्या इतर दोन विशेषता म्हणजे ते
अमेरिकेतील सायकॉलॉजीचे पहिले पीएचडी आणि अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनचे
संस्थापक!)
आपण जर ओघाने आपल्या
आजी-आजोबा, पणजोबा यांच्या पीढीच्या जीवनप्रवासाकडे नजर टाकली तर असे
लक्षात येईल की काही दशकांपूर्वीपर्यन्त माणसे पौंगडावस्थेतून सरळ प्रौढावस्थेत
पदार्पण करीत. उच्च शिक्षणाचे प्रमाण फारसे नसे व त्यासाठी फार वर्षे देखील लागत
नसत. लग्न व मुलबाळ लवकर होत असे. एकूणच प्रौढ जीवनाच्या जबाबदार्या विशीतच
स्वीकारल्या जात आणि माणसे कुटुंब व काम यामध्ये चटकन ‘सेटल’ होत असत.
मात्र हळुहळु हे स्वरूप बदलायला लागले आहे. आता पौंगडावस्था ते प्रौढावस्था असे लगेच संक्रमण होत नसून या प्रवासाला बराच कालावधी लागतोय. उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले असून आजकाल अनेकदा 27 - 28 वयापर्यंत (अनेकदा त्याच्याही पुढे) लोक औपचारिक शिक्षण घेत असतात. लग्न होण्याचे वय वाढत चालले आहे आणि साहजिकच मुले देखील उशिरा होत आहेत. तरुण-तरुणी ‘सेटल’ होण्याआधी विविध पर्याय (कामाचे, जागेचे, जीवनशैलीचे, जोडीदाराचे) ‘एक्स्प्लोअर’ करु इच्छितात व त्यासाठी वेळ घेताहेत. ज्या 18 ते 29 वयोगटाला आपण युवा म्हणतोय त्यातील अनेक जण हे आता ‘ऍडॉलेसेन्ट’ तर नाही पण पूर्णत: ‘ऍडल्ट’ देखील नाही अशा एका मधल्या अवस्थेत आहेत.
बालमृत्युचा प्रश्न
पूर्णत: संपला जरी नसेल तरी आपल्या देशासाठी ते आता तेवढे मोठे आव्हान उरलेले
नाही. जगण्याची संधी मिळून आता युवावस्थेत पोहोचलेल्या (आणि पुढील वर्षांत येऊ
घातलेल्या) कोट्यवधी तरुण – तरुणींना आपण कसे घडवतो, घडायला
मदत करतो हा आता आपल्यापुढचा सर्वात कळीचा प्रश्न असणार आहे.
युवावस्थेतील महत्त्वाची लक्षणे काय, यूथ फ्लरिशिंग म्हणजे नेमकं काय, युवांना पडणारे मुख्य प्रश्न कोणते, ‘पर्पज’ ही संकल्पना नक्की काय व युवांसाठी त्याचे महत्त्व काय, करियरची निवड, मूल्यव्यवस्था, आर्थिक गरजा व आकांक्षा, भावनांविषयी जागरूकता व व्यक्त होता येणे, युवा व व्यसने, युवांची सामाजिक जबाबदारी व कृतीशीलता, इ. अनेक विषय या सदरातील पुढील लेखांत आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. त्यातील माहितीचा उपयोग करुन ज्याला अधिक समजून घेता येईल आणि ज्याच्या विकासात योगदान देता येईल असा तुमच्या परिचयातील किमान एक इमर्जिंग ऍडल्ट शोधून ठेवा! भेटूच लवकर!
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.
वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.
amrutabang@gmail.com
Saturday 23 December 2023
लग्न - सहकार की व्यवहार?
मी शिक्षणाने इंजीनियर आहे. कॉलेजच्या प्लेसमेंट्सनंतर मी नागपूरला एका बहुराष्ट्रीय कंपनीत काही काळ नोकरी केली, पण कामाचं समाधान लाभेना, म्हणून मी ती नोकरी सोडली. आणि कित्येक वर्षांपासून मनात साचलेलं, 'समाजासाठी काम करायचंच,' या प्रेरणेनं गडचिरोली जिल्ह्यातील एका मोठ्या सामाजिक संस्थेबरोबर जोडली गेले. गेली पाच वर्ष मी तिथेच काम करत आहे. मला माझं काम आवडतं, त्याचा होणारा दृश्य परिणाम लक्षात येतो, बरोबरीने माझादेखील सातत्यानं विकास होतो आहे, हे जाणवतं आणि मनःपूर्वक समाधान वाटतं. काही आठवड्यांपूर्वीच मी २७ वर्षांची झाले. वाढदिवसानंतर अनेकांनी मला विचारलं, की आता लग्नाचं काय? घरीदेखील याविषयी चर्चा सुरू झाली. मी लग्नाला तयार आहे. पण मला चिंता वाटते आहे. आणि भीतीदेखील.
कारण...
रुजत आलेलं माझं इथलं काम मला सोडायचं नाहीये. कुणी विचारेल, की मग अडचण कुठे आहे? अडचण समाजधारणेत आहे. मी मुलगी, तरुणी, स्त्री असण्यात आहे.
लग्नानंतर सासरी
जाणं, लग्नानंतर
मुलीने आपलं घर, कुटुंब
आणि त्या घरातील जवाबदाऱ्या सोडून सासरी, नवऱ्याच्या घरी जावं, तिथून पुढे तेच तिचं सासर- म्हणजे घर असणार आहे, अशी प्रथा, मानसिकता अजूनही समाजात रूढ आहे. ती
वर्षानुवर्षे आहे हे मान्य; पण
म्हणून, मुलीनेच स्वतःचं घर
का सोडावं? आपल्या कुटुंबाप्रति
असलेल्या कर्तव्यास तिलांजली का द्यावी? करिअर-नोकरीबाबत तडजोड का करावी? हा माझ्यासारख्या मुलींना सातत्याने
पडणारा, परंतु अद्याप उत्तर न सापडलेला
प्रश्न.
असं म्हटलं जातं, की फार पूर्वीच्या काळात मुबलक प्रमाणात जमीन जिथे उपलब्ध आहे, तिथे पती-पत्नी लग्नानंतर आपला संसार सुरू करायचे. जमीन ही स्थावर असल्यामुळे आणि त्याचा व्यवहार करण्याची यंत्रणा त्या वेळी विकसित न झाल्यामुळे, ज्याच्याकडे जमीन जास्त, त्याच्याकडे संसार सुरू व्हायचा. मुलाकडे जमीन कमी असल्यास मुलगा लग्नानंतर मुलीकडे जायचा आणि जीवनातील नव्या पर्वाला सुरुवात करायचा. उत्तरोत्तर पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व वाढलं आणि मुलींच मुलाकडे कायमस्वरूपी जावं, ही प्रथा समाजात रूढ झाली. परंतु वर्तमानात, जिथे जमिनीचे व्यवहार करणं सुलभ झालं आहे, संपत्ती साठवण्याचे इतर स्रोत उपलब्ध आहेत आणि शिक्षण, आर्थिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येऊ लागलेली असतानाही ही प्रथा का सुरू राहावी?
स्वातंत्र्य; पण लग्नापर्यंतच!
आज नोकरी-व्यवसायासाठी अनेक तरुण- तरुणी घरापासून दूर जातात. मुंबई-पुणे ही शहरे तर अनेकांना आकर्षित करतात. परंतु 'सासरघरी जायचं' असल्यानं तरुणींना स्वतःच्या नोकरीचं ठिकाण निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र गमवावं लागतं. पती-पत्नी दोघंही छोट्या शहरातील असल्यास, जर तरुणीला मुंबईला आणि तरुणाला पुण्याला नोकरी मिळाली तर अगदी क्वचित घडणारा अपवाद सोडल्यास त्यांच्यातल्या पत्नीलाच मुंबईतील नोकरीचा पर्याय सोडून पुण्याला नोकरीचा शोध घ्यावा लागतो. माझ्या शेजारी राहाणारी एक प्रेमविवाह झालेली तरुणी. एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे हे दोघे. लहानपणापासून एकत्र वाढलेले. शिकता शिकता प्रेम जुळलं. दोघंही इंजिनीयर झाले. त्याला दुबईला नोकरी मिळाली. तीन वर्षांनंतर दोघांनी लग्न केलं. दरम्यान, तिलाही मुंबईतच चांगल्या कंपनीत, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. सध्या ती सासूबरोबर राहते. नवरा लग्नानंतर लगेच दुबईला गेला आणि तो भारतात लगेच परत येणार नाही, हे नक्की झालं. त्यामुळे तिला तिथे नोकरी मिळेल का याची चाचपणी सुरू झाली, कारण तिला नवऱ्याकडे जावं(च) लागणार आहे. याचं कारण तसं गृहीतच आहे. अशा परिस्थितीत नेहमीच 'Adjustment' करावी लागते ती स्त्रीलाच. याचा पाया मुलीच्या लहानपणापासूनच रचला जातो. शिक्षण, मित्रमैत्रिणी, छंद आणि अंतिमतः नोकरी या साऱ्याचं स्वातंत्र्य मुलीला मिळतं... पण अर्थात 'लग्नापर्यंतच'! 'तुला जे करायचं आहे ते कर. पण लग्नानंतर मात्र नवऱ्याच्या, सासरच्या कलानं गोष्टी कराव्या लागतात,' असं अनेक आई-वडील आपल्या मुलीला बिनदिक्कत सांगत असतात. इतर सर्व बाबतींत मुलीला सूट दिली जाते, परंतु लग्नाचा विषय निघाला, की मर्यादांचा पाढा सुरू होतो. मुलांना मात्र स्वातंत्र्य आणि तेही 'लाइफटाइम'. मुलींना निवडक स्वातंत्र्य; तेही लग्नापर्यंतच! मग प्रश्न पडतो, की मुली खरंच स्वतंत्र आहेत का? मुली म्हणून करिअर, इच्छा-आकांक्षा आणि कर्तव्यांचे (कुटुंब आणि समाजाप्रति) काय? या देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून स्वतःची प्रगती करण्याचा, जीवनविषयक किंवा सामाजिक जाणिवांवर काम करण्याचा, त्यानुसार जगण्याचा अधिकार मुलींना नाही का? मुलीनं कायमच त्याग करायचा किंवा तडजोड करायची आणि मुलानं लाभ घ्यायचा. याला लग्न म्हणायचं की एखादी 'वन साइडेड बिझनेस डील'?
भौगोलिक विकासातील असमानतेचा आणि खासगी नोकरीपेक्षा सामाजिक कार्याला कमी समजण्याच्या समाजमान्यतेचादेखील परिणाम होतो. मी स्वतः जर पुण्यात किंवा बंगळूरूला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करून 'सेटल' होण्याचा निर्णय घेतला आणि तसाच मुलगा हवा, असा आग्रह धरला, तर तो काही प्रमाणात रास्त समजला जाईल. मुलगी 'मॉडर्न' आहे, 'करिअरिस्टिक' आहे असं मानलं जाईल. पण मी जर गडचिरोलीत राहून पूर्णवेळ सामाजिक कार्य करायचं म्हणते आहे तर त्याला मात्र वेडगळपणा समजलं जाईल! इथे येऊन सेटल होणारा मुलगा हवा किंवा त्यानं इथून त्याचं 'वर्क फ्रॉम होम' करावं, किंवा अन्य पर्याय शोधावा, असं जर मी जाहीर केलं, तर ती अवास्तव अपेक्षाच मानली जाईल.
सातत्याने गृहीत धरणं!
दुसऱ्या एका तरुणीचं उदाहरण पाहूयात. ती ५ वर्षांपासून नोकरी करत आहे. उत्तम काम करत असल्यामुळे तिची प्रगती होतच आहे, परंतु ते काम म्हणजे तिच्यासाठी नुसती नोकरी नाही, तर तिला त्याचा ध्यास आहे, ते तिचं 'पॅशन' आहे. घरी लग्नाचं बोलणं सुरू झालं की मात्र तिला दडपण येतं. तिचं स्वप्न, तिचं करिअर, तिचं काम यांचं काय होणार? कारण आईवडिलांनी ठरवलेलं स्थळ त्यांच्या दृष्टीनं एकदम उत्तम आहे. पण या स्थळाचा आग्रह आहे की तिने नोकरी सोडावी किंवा 'वर्क फ्रॉम होम' करावं. ही एकतर्फी त्यागाची अपेक्षा योग्य आहे का? हा तिचा प्रश्न आहे. आणखी एक उदाहरण. माझ्या ओळखीतल्या एका तरुणीने लग्न केलं. नवरा-बायको दोघांचंही करिअर उत्तम चालू आहे. घरात 'सपोर्ट सिस्टीम' ही उत्तम आहे. त्यामुळे सगळं चांगलं चाललं होतं. अचानक सासूची तब्येत बिघडली तेव्हा पहिली अपेक्षा सुनेने सुट्टी घ्यावी ही होती. नंतर तो आजार जेव्हा गंभीर निघाला, तेव्हा तिनं नोकरीच सोडावी, असा जणू फतवाच निघाला. आईच्या आजारपणात मुलाने रजा घ्यावी किंवा घरातल्यांनी एकत्र बसून त्यावर काही तडजोडीचा उपाय शोधावा, हा विचारच कुणी करू नये? की सेवाभाव बाईलाच जास्त जमतो, तीच योग्य रीतीने काळजी घेऊ शकते, असं गृहीत धरून तिला त्याकामी लावावं? हा कुठला न्याय? खरं तर काळानुसार तरुणांनीही विचार करायला हवा की त्यांच्या संसारासाठी, बायकोसाठी ते काय देऊ शकतात? व्हॉट ही कैन ऑफर टू हिज फॅमिली?
आणखी एक उदाहरण. अश्विनीला वर्षाला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. त्याचबरोबर ती सुगरण आहे, तब्येतीनं 'फिट' आहे, हुशार आहे आणि ऑफिसमध्ये ५ जणांची टीम लीड करते. वयाच्या २८ व्या वर्षी तिच्याकडे एक चारचाकी गाडी आहे आणि नुकताच तिनं एक फ्लॅट बुक केला आहे. मागच्या महिन्यात अश्विनीला घरच्यांनी एक स्थळ सुचवलं. तिलासुद्धा वाटतंय, की आता तिला आवडेल लग्न करायला. 'कांदेपोहे' कार्यक्रमासाठी आलेल्या आशीषला तिने प्रश्न विचारला, "सो, टेल मी आशीष, व्हॉट डू यू प्लॅन टू ऑफर इन धिस रिलेशनशिप?" बापरे! या प्रश्नावर घरात असं काही वादळ उठलं की विचारायलाच नको! खरं तर हा प्रश्न तरुणींनी भावी नव-याला विचारायच्या आधीच तरुणांनी स्वतःलाच विचारायची वेळ आली आहे. स्त्री आता परावलंबी नाही राहिलेली. ती स्वतंत्र होते आहे. तिला तिच्या घरापलीकडे ओळख मिळते आहे. हा प्रश्न कधी समाजाच्या मनात आलाच नाही का की आता कदाचित स्त्रियांच्याही अपेक्षा बदलल्या असतील? त्याही काही वेगळा विचार करत असतील? त्यांच्या काही वेगळ्या मागण्या असतील? आणि का नसाव्यात? या बदलत्या परिस्थितीत जोडीदार म्हणून एक तरुण आपल्या होणाऱ्या बायकोला खरंच काय मूल्यवर्धक गोष्टी देऊ शकतो याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. इथे कुणी हे विचारू शकेल, की हेच तरुणांच्या बाबतीतही होऊ लागलं आहे. आजकालच्या मुली, अगदी नोकरी न करणाऱ्यासुद्धा खेडेगावांत किंवा फार सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी यायला उत्सुक नसतातच. त्यामुळे एखाद्याला अशा ठिकाणी काम करत आयुष्य घालवायचं असेल तर त्याच्या समोरही प्रश्नचिन्ह आहे. हे मान्य आहेच; परंत मुलींच्या बाबतीत हा प्रश्न सध्या प्राधान्याने येतो आहे, कारण मुली आता वेगळं करिअर करू लागल्या आहेत.
मुलांचंही असावं 'न्यू नॉर्मल!'
आमच्या संस्थेच्या समुदायातीलच डॉ. सूरज म्हस्के या आमच्या मित्राने वेगळी वाट निवडली आणि थेट ग्रामीण भागात जाऊन सेवाभावी रुग्णालय सुरू केलं. शहरातील आर्थिक भरभराटीचा पर्याय सोडणाऱ्या सूरजला त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पत्नी, डॉ. जानकी भेटली. या जोडीच्या अगदी उलट म्हणजे माझी एक मैत्रीण डॉ. हर्षा कुमारी आणि तिचे पती. हर्षादेखील एका सामाजिक संस्थेत काम करते. या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे हर्षाच्य पतीने तिच्यासोबत 'शिफ्ट' होऊन 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वतः निवडला. एकीकडे सुरजबरोबर ग्रामीण भागात, सामाजिक क्षेत्रात आलेली जानकी तिनं निवडलेला पर्याय हा 'अपेक्षित' वाटतो, तर दुसरीकडे हर्षासोबत आलेला तिचा पती- याचं उदाहरण मात्र 'दुर्मीळ' आहे! अर्थात, दुर्मीळ असलं तरी शक्य आहे आणि मुलांसाठी 'न्यू नॉर्मल'चा पायंडा पाडणारं आहे. मुलांनी 'न्यू नॉर्मल'चा गांभीर्याने विचार केल्यास आणि तरुण-तरुणीने एकत्र चर्चा करून ठरवल्यास अनेक मुलींना कामाविषयी वाटणारी अनिश्चितता नक्कीच कमी होऊ शकेल.
एम. डी. असलेली माझी एक डॉक्टर मैत्रीण- जी आदिवासी भागात गेली ३ वर्ष उत्कृष्ट काम करत आहे. पश्चिम घाटात पर्यावरण संवर्धनाचं काम करत असलेली दुसरी एक 'एम.एस्सी.' झालेली तरुणी तिथेच राहून काम करते आहे. मराठवाड्यातील गरजू कुटुंबांतल्या लहान मुलांच्या शिक्षणावर काम करणारी तरुणी, 'सायकियाट्री'त 'एम.डी.' करणारी आणि भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार देऊ इच्छिणारी आणखी एक मैत्रीण... अशा अनेक तरुणी आहेत. यांना आता त्यांचा जिथे जम बसला आहे तिथेच स्थायिक व्हायचं असेल तर त्यांना लग्नाच्या बाबतीत सुयोग्य जोडीदार मिळेलच याची खात्री नाही. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आणि देशाच्या 'यंग अँड प्रॉडक्टिव्ह वर्कफोर्स'चा (तरुण आणि कार्यक्षम मनुष्यबळाचा) भाग बनणाऱ्या तरुणींचं प्रमाण वाढतं आहे, ही अतिशय आशादायक आणि आनंददायी बाब आहे. मात्र त्याबरोबर सामाजिक क्षेत्र असो, वा खासगी क्षेत्र; तरुणींचं काम आणि त्यांचं करिअर यालादेखील समान प्राधान्य देणं आवश्यक आहे, अविभाज्य आहे. लग्न झालं, की ती तरुणीच फक्त जागा बदलून नवऱ्याच्या ठिकाणी जाईल, तिथे काम शोधेल, त्यानुसार आपलं करिअर 'Adjust' करेल वा बदलेल, अशा अपेक्षा ठेवणं आता बदलायला हवं. ते योग्यही नाही आणि वास्तववादीदेखील नाही. तसा बदल काही प्रमाणात होतो आहे, मात्र तो वाढायला हवाय.
दोघंही नोकरी वा व्यवसाय किंवा वेगळं करिअर करत असतील, तर लग्नाचा निर्णय घेताना आणि जोडीदार निवडताना म्हणजे लग्नाच्या आधीच दोघांना सुसंगत असलेल्या ठिकाणाचा विचार व्हायला हवा. कुणाचं काम कुठे आहे आणि कुठे करणं आवश्यक आहे, कुणाच्या कामाची जागा वा प्रकार बदलणं तुलनेनं सोपं आहे, कुणाच्या कामाचा विशेष सकारात्मक सामाजिक परिणाम घडू शकतो आणि त्यामुळे ते अबाधित ठेवावं, आदी बाबींचा, 'टिपिकल' दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन विचार करणं, हे आता जरुरी आहे.
दोघांकडून योगदान अपेक्षित!
कोणत्याही नात्यात दोन्ही व्यक्तींकडून प्रयत्न आणि योगदान होणं आवश्यक असतं. लग्न तर दीर्घकाळासाठी जोडलं जाणारं नातं आहे. यात जर नवऱ्याच्या उत्कर्षासाठी त्याची बायको योगदान देत असेल, तर मग तिच्या उत्कर्षासाठी त्याने योगदान द्यायला हवं. त्यामुळे स्त्रियांनाही त्यांच्या स्वधर्माच्या मार्गावर चालणं सुकर होईल आणि एकूणच आपला समाज एका नव्या दिशेनं पुढे जातानाचं चित्र पाहण्याचा आनंद आपल्याला मिळेल.
मी माझ्या कामानिमित्तानं अनेक तरुणींशी चर्चा करत असते. नोकरी करणाऱ्या, न करणाऱ्या, शिक्षण घेत असलेल्या, अनेक जणी लग्नाच्या वयात आल्यानंतरही नवरा नेमका कसा हवा- इथे पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे विचार करणं अपेक्षित- पुढे त्या काय करणार आणि कुठे राहणार, याविषयी संभ्रमात असतात. लग्नानंतर माझं आयुष्य कसं वळण घेईल याविषयी त्यांच्या मनात प्रचंड असुरक्षितता असते. त्या सगळ्यांच्या मनावर समाजाचं एक अदृश्य दडपण आहे. लग्न तर करायचंय, करिअर किंवा वेगळ्या वाटेवर चालायचंही आहे, पण मग समाजाला योग्य वयात लग्न होणंही अपेक्षित असतं, अशा वेळी कशाला महत्त्व द्यायचं?
आपल्या समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्त्रियांची यादी जर आपण पाहिली, तर त्यातील अनेक जणींना त्यांच्या जोडीदाराचा भक्कम पाठिंबा लाभला. मग त्या मुलींच्या शिक्षणासाठी राबणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत, गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाऊन स्त्रीरोगांवर अभ्यास करणाऱ्या डॉ. राणी बंग असोत किंवा सुधा मूर्ती असोत! अशी अनेक उदाहरणं आहेतच, मात्र हे केवळ अपवादात्मक न राहता सर्वांसाठी कसं साध्य होईल ते बघणं महत्त्वाचं आहे.
aditipidurkar95@gmail.com